खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सूर्यप्रकाशा एव्हढे सत्य आहे की, दि. १ मे रोजी पोलिस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. त्यामुळेच सजग आणि सतर्क असणाऱ्या व शोध पत्रकारितेचा मानदंड मानला जाणारा गोपनीय खबऱ्याच्या पत्रकारांनी वृत्तधर्माचे पालन करीत प्रशासनाला सदर बाब बातम्यांमधून लक्षात आणून दिली आहे. याबाबत सांगली जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहणे हे प्रथम कर्तव्य खरेतर प्रशासनाने करायला हवे होते. शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम दि. १ मे रोजी सकाळी ९ वाजता झाले. त्यानंतर पथसंचलन आणि समाजाभिमुख काम करणार्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम झाला. सुमारे दीड तास कार्यक्रम झाला. परंतु या दीड तासात पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या भारतीयांना श्रद्धांजलीसाठी प्रशासनाने दीड मिनीटांचाही वेळ दिला नाही. ही गंभीर चूक गोपनीय खबऱ्याने आपल्या वृत्तांमधून मांडली आहे.
विशेष म्हणजे, ध्वजवंदन कार्यक्रमात पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी उपस्थित असतांना कुणाच्याही ही महत्वाची बाब लक्षात आली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. कार्यक्रमाच्या व्यवस्थापक व आयोजकांना याचा विसर पडू शकतो हे मान्य आहे. हा काही देशद्रोह नाही. पण पुढील वेळेस चूक होऊ नये, अशी अपेक्षा बातमी करताना पत्रकारांची असते. शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही हे त्या ठिकाणी उपस्थित शेकडो लोकांना माहीत आहे. अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस प्रशासन असे विविध घटक ही बाब जाणून आहेत. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याही अंतरात्म्याला हे माहिती आहे की श्रद्धांजली न वाहण्याची चूक झाली आहे.
सदर शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात जर खरंच श्रद्धांजली वाहण्यात आली असेल तर त्यासंबंधीचे पुरावे फोटो आणि व्हिडिओ द्यावेत असे खुले आव्हानसुद्धा गोपनीय खबऱ्यातर्फे प्रशासनास करण्यात आले आहे.


