नागरिकांच्या समस्या शासन दरबारी घेऊन त्याचा पाठपुरावा केल्याचे आपण नेहमीच काही नेत्यांच्या बाबतीत पाहत आलोय. परंतु, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी प्रभागाचा नाही, कोणत्या गावाचा नाही, स्वतःच्या फायद्याकरिता नाही तर संपूर्ण सांगली – मिरज व मिरज – सांगली असा प्रवास करणाऱ्या तमाम जनतेसाठी हा मुद्दा उपस्थित करीत तातडीने याची अंमलबजावणी व्हावी आणि नागरिकांना सुटकेचा श्वास घेता यावा यासाठी पाठपुरावा केलाय. सांगली- मिरज रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाची सध्याची अवस्था बिकट आहे. जीर्ण झालेला पूल कधीही कोसळून दुर्घटना घडू शकते. म्हणून लोकहितासाठी युवानेते समित कदम यांनी निवेदन देत मंत्री महोदयांकडे मागणी केली आहे.
सांगली-मिरज रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित असलेल्या मारुती मंदिर शेजारील उड्डाण पुलाचे काम सुरु होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन या प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.
वाहतुकीचा मोठा भार या मार्गावर असून, उड्डाण पुलाचे काम सुरू करताना सुरुवातीला पर्यायी पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे. अन्यथा वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या कामाची सुरुवात करून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्याचे समित कदम यांनी निवेदनात म्हटले आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही यासंदर्भात तत्परतेने सहकार्य करू, अशी ग्वाही दिली आहे.
उड्डाण पुलामुळे वाहतुकीचा भार कमी होणार असून, अपघातांचा धोका देखील कमी होईल. सांगली मिरज रोडवरील जुना पूल बऱ्याच ठिकाणी ढासळत चालला आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचे काम तातडीने हाती घेणे अत्यंत आवश्यक असल्याने समित कदम यांनी याबाबत आग्रही भूमिका घेतलेबद्दल नागरिक व प्रवाशांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.

