- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केलीय. १५ दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. मुंबईत दादर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते अमर हिंद मंडळाच्या व्याख्यानमालेत उपस्थित होते.
तिथं बोलताना गडकरी म्हणाले की, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रबोधन महत्त्वाचं आहे. पण आपल्या देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता आहे.
नितीन गडकरी यांनी व्याख्यानमालेत बोलताना टोलबाबत म्हटलं की, मी टोलबद्दल जास्त सांगणार नाही. मात्र १५ दिवसात अशी पॉलिसी येईल की तुमची काहीच तक्रार राहणार नाही. हे मी महाराष्ट्रातल्या टोलबद्दल बोलत नाहीय. एनएचआय, राष्ट्रीय महामार्गाबद्दल बोलतोय असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आता टोलनाके राहणार नाहीत. मात्र सॅटेलाइट सिस्टिमद्वारे तुम्ही तिथून गेल्यानंतर तुमच्या नंबरप्लेटवरून बँक खात्यातले पैसे कट होतील. पुढच्या दोन वर्षात इंडियन रोड इन्फ्रा अमेरिकेपेक्षा चांगले होईल. मुंबई गोवा महामार्गही जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
हॅपी इंडेक्सच्या मुद्द्यावरही नितीन गडकरी या व्याख्यानमालेत बोलले. ते म्हणाले की, डोमेस्टिक हॅपिनेस इंडेक्स वाढवायला पाहिजे असं भूतानच्या पंतप्रधानांनी सांगितलं. मात्र गावात प्यायला पाणी, रस्ते, रोजगार, शिक्षण मिळायला हवं. आर्थिकदृष्ट्या गरिबी दूर व्हायला पाहिजे. चांगलं घर असायला हवं असे वेगवेगळे इंडेक्स आहेत. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची गरज आहे. देशाला श्रीमंत बनवायचं असेल तर रस्ते आवश्यक आहेत असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.
मुंबई ते बंगळुरू रस्त्याबाबत नितीन गडकरी म्हणाले की, अटल सेतूवरून उतरल्यानंतर एका रस्त्याचं काम सुरू केलंय. तो रस्ता थेट पुण्याच्या रिंगरोडला जोडला जाणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पेक्षा तीन पट रुंद असलेला हा रस्ता पुढे थेट बंगळुरूला जाणार आहे. दोन ते तीन वर्षाच मुंबई ते बंगळुरू अंतर पाच तासात कापलं जाईल असा दावा नितीन गडकरी यांनी केलाय. तर मुंबई ते दिल्ली अंतर ४८ तास लागतात पण आता हेच अंतर १२ तासात गाठता येईल. यासाठी रस्ता बांधून तयार असल्याचंही गडकरी म्हणाले.