कोल्हापूर येथून निघालेल्या भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून वाहन दुभाजकावर धडकले. या अपघातात ३५ प्रवासी जखमी झाले असून, जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
तर प्रकृती बिघडलेल्या काहींना नागपूर रवाना करण्यात आले आहे. शहरापासून१२ किलोमीटर अंतरावरील हिवरी शिवारात सोमवारी (ता. २४) पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच हिवरीग्रामस्थांसह पोलिसांनी मदतकार्य सुरू केले होते. कोल्हापूर येथून रविवारी (ता. २३) रात्री ट्रॅव्हल्स (क्र. एमएच ४० सीएम ५०३५) नागपूरच्या दिशेने निघाली होती.
अशात यवतमाळ तालुक्यातील हिवरी शिवारात येताच भरधाव वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन थेट दुभाजकावर जाऊन आदळले. अपघात इतका भीषण होता की स्टेअरींगसह समोरचा काच फोडून चालक थेट बाहेर फेकल्या गेला, तर वाहनाचे इंजिन प्रवासी दरवाजाजवळ धडकले होते. वाहनाच्या समोरील भाग पूर्णतः चकनाचूर झाला होता. गाढ झोपेत असलेले ३५ प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य चालू केले. तातडीने रूग्णवाहिकांना बोलावून ट्रॅव्हल्समधील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे वळते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत कावरे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले.
या अपघातातील जखमींमध्ये राजेंद्र उट्टलवार, अर्णव राजेंद्र उट्टलवार, योगेश नावलकर, अविनाश ढोबळे, गुलाब सिंग, रवी जाधव, सोनू नांदे, नितीन शिवणकर, नितीन श्रीरामे, वैशाली जोशी, दीपक कुमार, महेशकुमार, आकाश नागरगोजे, शिवांश चावरे, वसंता भीतकर, एम.आर. बिलाल, राकेश भागवत, प्रज्योत भालावरे, सुधीर पाटील, उमा शिवणकर, विशाल पेटूकले, विशाल मात्रे, कमला कोमेकर, जवेद्रसिंग हरदयसिंग, अब्दुल हक अब्दुल शकील, गिरीश मिश्रा, ईश्वर आडे, शामबाला माळी, सुजाता डांगे, सबली मीना, बबली मिश्रा, शिल्पा चन्ने, प्रवीण पवार, रवींद्र वानखडे, धनराज चौरे आदींसह इतर प्रवाशांचा समावेश आहे.
- काही प्रवासी इतर जिल्ह्यातील
हिवरीनजीक घडलेल्या अपघातानंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली. जखमी रुग्णांवर तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू झाला. जखमी झालेल्या रुग्णांमध्ये बरेच बाहेर जिल्ह्यातील आहेत. यात नागपूर, यवतमाळ, सांगली, भंडारा, वर्धा, कोल्हापूर, लातूर, जयपूर, ईस्लापूर, रामपूर आदी जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश आहे. अपघाताबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, ते सुखरूप असल्याचेही कळविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

