- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमपुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
जयंत पाटील हा किरकोळ माणूस आहे, लोकांनी त्यांना आता फक्त ११ हजारांवर आणून ठेवलं आहे. पुढच्या वेळी ते राजकारणात राहू शकत नाहीत. सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर खोत यांच्यासारखा सक्षम उमेदवार इस्लामपूरमध्ये ताकदीने लढला, तर जयंतराव पडू शकतात आणि मी आहेच की सर्व बहुजन त्या उमेदवाराच्या पाठीमागं लावणार, असा प्लॅनच आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगून टाकला.
गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकारणातील फार मोठा विषय राहिलेला नाही. त्यांचा एक भाचा आमदार होता, तो त्यांचा समर्थक होता. दुसरे समर्थक होते, शिराळ्याचे मानसिंंगराव नाईक. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना, राज्यात मंत्री असताना जयंतरावांचे दोनच आमदार समर्थक होते. आता त्यांचा आमदार भाचा पडला, मानसिंगराव नाईकही पराभूत झाले. त्यांना आता राज्यात समर्थकच राहिलेला नाही. मी चाळीस हजार मतांनी निवडून आलोय, ते अकरा हजार मतांनी निवडून आलेत. जयंत पाटलांकडे ती ताकद आता राहिलेले नाही.
जयंत पाटील (Jayant Patil) हे किरकोळ माणूस आहेत, लोकांनी त्यांना फक्त अकरा हजारांवर आणून ठेवलं आहे. त्यांच्याविरोधात सक्षमपणे कोणी लढलं असतं, तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते पन्नास हजार मतांनी पडले असते. त्यामुळे ते कोठे गेला, कोणाला भेटले, याबाबत मला काही विशेष वाटत नाही. जयंतराव हा घरघर लागलेला माणूस आहेत, असा दावाही पडळकरांनी केला.
आमदार पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांचा कुठेही प्रभाव गट नाही. कोल्हापूर, सातारा, सोलापूर येथेही त्यांचा प्रभाव नाही. सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघात त्यांचा संबंध नाही. जतमधून त्यांच्या मुलाला निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करण्यात आली होती. वर्षभर बॅनरबाजी केली, इकडं तिकडं केलं. त्यांच्या कुठल्या सर्व्हेत तो पुढे दिसेना. त्यांच्याकडे लय मोठी कंपनी आहे, ते सर्व्हे करून घेतात, असं म्हटलं जातंय. पण, सर्व्हेत त्यांचं पोरगं काय पुढे दिसेना.
जतनंतर जयंत पाटील यांनी मुलासाठी हातकंगणले लोकसभा मतदारसंघातही प्रयत्न केला. पण, त्या ठिकाणीही सर्व्हेंचा निष्कर्ष त्यांच्या बाजूने येईना. मग, आता राहिलं काय इस्लामपूर. इस्लामपूर सोडून त्यांचं कुठं काय राहिलं नाही. इस्लामपूरमध्येही लोकांनी त्यांना फार काठावर आणून ठेवलंय. पुढच्या वेळी ते राजकारणात राहू शकत नाहीत. इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर खोत यांच्यासारखा सक्षम उमेदवार ताकदीने लढला, तर जयंतराव पडू शकतात, असा दावाही पडळकरांनी केला.

