‘आमच्या पाठीमागे फार मोठी राजकीय ताकद आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. अन्यथा तुमचा संतोष देशमुख करण्यासही कमी करणार नाही’, अशी धमकी अनंत पोळ यांना दिली आहे. याबाबत पोळ व पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
‘मुरूम उत्खनन करण्यास विरोध केलास, तर तुझा संतोष देशमुख करीन’, अशी धमकी येळावी (ता. तासगाव) येथील मुरूम माफियांनी दिल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी मुरूम तस्कराविरोधात अनंत पोळ व उमेश पाटील (रा.येळावी) यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे तक्रार केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण देशभर गाजत असताना तासगाव तालुक्यात मुरूम माफियांनी तक्रार करणार्या सामान्य लोकांना धमकावण्याचे काम सुरू केले आहे. मुरुमाच्या उपशाबरोबरच येरळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. परिणामी येरळा काठची शेती धोक्यात आली आहे. दररोज शंभरहून अधिक वाहनातून वाळूची तस्करी राजरोसपणे सुरू आहे. गेल्या काही दिवसात तासगाव पोलिसांनी वाळू तस्करी पकडून तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र महसूल विभाग सुस्त असल्याचे दिसत आहे. येरळा नदीच्या तासगाव हद्दीतून तर दिवसा ढवळ्या तस्करी सुरू आहे.
अनेक ठिकाणी मुरूम, दगड , वाळू, मातीच्या उत्खननाला विरोध केला जात असला तरी हे तस्कर कोणालाही जुमानत नाहीत. त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने ते प्रशासनाला जुमानत नाहीत.
येळावी येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनंत जालिंदर पोळ व जिल्हा उपाध्यक्ष उमेश भुजंगराव पाटील यांनी मुरूम उत्खननाला विरोध केला होता. हे उत्खनन महसूल बुडवून होत असल्याचा आरोप केला होता. मात्र मंडळ अधिकार्यांसह महसूलच्या यंत्रणेने याबाबत दखल घेतली नाही. उलट मुरूम तस्करांनी पोळ व पाटील यांना धमक्या दिल्या आहेत.
मुरूम, वाळू माफियांची गुंडगिरी मोडीत काढा : जिल्हाधिकारी
येळावी येथील अनंत पोळ व भुजंगराव पाटील यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी तातडीने तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना फोन केला. तासगाव तालुक्यातील मुरूम, माती, दगड, वाळूच्या तस्करीबाबत तक्रारी येत आहेत. हे माफिया सामान्य लोकांना धमकावत आहेत. त्यांच्यावर गुंडगिरी करीत आहेत. त्यांची ही गुंडगिरी मोडीत काढा, अशा सूचना काकडे यांनी तहसीलदार पाटोळे याना दिल्या.