भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथील मानद संचालक डॉ. हणमंतराव मोहनराव कदम (वय 60) यांचे आज, शुक्रवारी (दि. 14) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. माजी आमदार मोहनराव कदम यांचे ते पुत्र तर माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे ते चुलत बंधू व युवा नेते डॉ जितेश कदम यांचे ते वडील होते.
त्यांच्या निधनाने भारती विद्यापीठ परिवारासह कडेगांव पलूस मतदारसंघ व सांगली शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ हणमंतराव कदम यांचे भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात तसेच सांगली येथ भारती हॉस्पिटल मध्ये मोठे योगदान राहिले आहे. भारती परिवाराच्या आजवरच्या वाटचालीत त्यांचा सहभाग अतिशय मोलाचा राहिला आहे. अतिशय मितभाषी, कार्यतत्पर आणि दांडगा लोकसंपर्क ठेऊन त्यांनी भारती परिवाराचा वसा व वारसा जपला होता.
आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर मूळगावी सोनसळ तालुका कडेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथे मानद संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.