विधानसभेचे मिनी सभागृह म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून न्यायालयात असलेल्या प्रलंबित याचिकेमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.अशातच मतदारसंघातील झालेले बदल पाहता कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ बदलाच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
यापूर्वी 67 मतदारसंघ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मतदारसंघात बदल होऊन 74 मतदारसंघ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या मतदारसंघात तयारी केलेली इच्छुक आता या चर्चेमुळे धास्तावले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर कोणत्याही क्षणी या निवडणुका घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या मेहनती पाणी फिरण्याची वेळ आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी अनेकांची इच्छा असते. विधानसभेत जाण्यासाठी ही प्रमुख महत्त्वाची पायरी समजली जाते. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नेतृत्व करण्याची संधी याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून निर्माण होते.
सध्या निवडणूक खोळंबल्याने अनेकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. त्याला भरीत भर म्हणून जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची पुनर्रचना सुरू झाली आहे. मतदारसंघातील 67 मतदारसंघ आता 74 मतदारसंघ होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केलेल्या इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ येणार आहे.
तीन वर्ष सभागृह अस्तित्वात नसल्याने ग्रामीण भागातील विकासाला खीळ बसली आहे. अनेकांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून संपर्क दौरा सुरू ठेवला आहे. पण या निवडणुकीनंतर ही स्वराज्य संस्था निवडणुका न लागल्याने इच्छुकांच्या तोफा थंडावल्या आहेत. न्यायालयाचा निकाल स्पष्ट न झाल्याने निवडणुका लाबणीवर जाण्याची शक्यता आहे. अशातच मतदारसंघांची पुनर्रचना होण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या मतदारसंघ 67 असून पुन्हा त्यात सात मतदारसंघांची निर्मिती होणार असल्याची चर्चा आहे.
निवडणुका खोलांबल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी योजनांचा विसर पडला आहे. त्यामुळे इच्छुकांची कसरत पाहायला मिळत आहे. संभाव्य पुनर्रचनेनुसार करवीर तालुक्यात सर्वाधिक 13, हातकणंगले 11, शिरोळ 8, पन्हाळा 7, कागल 6, राधानगरी 6, शाहुवाडी 5, गडहिंग्लज 5, भुदरगड 4, चंदगड 4, आजरा 3 गगनबावडा 2 अशी संभाव्य पुनर्रचना होण्याची शक्यता आहे.