मुंबई प्रतिनिधी | महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा प्रचंड लांबला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होऊन ५ दिवस झाले असतानाही यादी अंतिम झालेली नाही. सर्वाधिक मतभेद उद्धवसेना – काँग्रेसमध्ये दिसून येत आहेत. त्यावर दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा निघाला नाही तर लोकसभेप्रमाणे पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये सांगली पॅटर्न प्रमाणे निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.
लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यास काँग्रेसमधून प्रचंड विरोध झाला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील सर्व नेत्यांनी जोरदार पाठिंबा दिला. कोणत्याही परिस्थितीत विशाल पाटील माघार घेणार नाहीत, असे स्पष्ट केले. त्यानंतर पाटील भरघोस मतांनी विजय झाले. तोच पॅटर्न राबवावा, असा प्रयत्न पाच मतदारसंघात होत आहे.सूत्रांनी सांगितले की, राज्यस्तरीय नेत्यांनी तसा निरोप त्या पाच मतदारसंघांतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना दिला आहे.
या जागांवर होऊ शकते मविआमध्ये मैत्रीपूर्ण लढत
रामटेक – लोकसभेत काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे रामटेकमध्ये निवडून आलेे. त्यामुळे रामटेक विधानसभेवर काँग्रेसने दावा केला आहे. मात्र, २०१९ मध्ये येथ अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल निवडून आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेथून ते शिंदेसेनेसोबत गेले. त्यामुळे रामटेकवर उद्धवसेनेने दावा केला आहे. काँग्रेसही जागा सोडण्यास तयार नाही.
सांगोला– महाविकास आघाडीतून सांगोला विधानसभा मतदारसंघ शेकापला सुटणार असल्याने शेकापने डाॅ. बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना उद्धव ठाकरेंनी खास मातोश्रीवर बोलावून घेतले. त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करून एबी फाॅर्मही दिला. सांगोल्याची जागा शेकापला न मिळाल्यास शेकाप एकही जागा लढणार नसल्याचा टोकाचा इशारा शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे. येथे सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे.
दर्यापूर– २००९ मध्ये भाजप तर २०१४ मध्ये तत्कालीन शिवसेनेमध्ये असलेले कॅप्टन अभिजित अडसूळ निवडून आले होते. २०१९मध्ये अडसूळांचा पराभव करून काँग्रेसचे विद्यमान खासदार बळवंत वानखडे विजयी झाले. २०१९ मध्ये अडसूळांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या गुणवंत देवपारे यांच्यासाठी काँग्रेस दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आग्रही आहे. दक्षिण नागपूर २०१९च्या निवडणुकीत भाजपचे मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात लढत झाली. ४०१३ मताने पांडव पराभूत झाले. या जागेवर काँग्रेसने पुन्हा एकता पांडव यांच्यासाठी दावा केला आहे. मात्र, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. काँग्रेस तसूभरही माघार घेण्यास तयार नाही.
पंढरपूर – मंगळवेढा- या मतदारसंघात दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी मविआकडे उमेदवारी मागितली आहे. भालके पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असल्याने त्यांना काँग्रेस उमेदवारी द्यायला तयार आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडूनही या जागेवर दावा करण्यात आला आहे. भाजपचे प्रशांत परिचारक यांच्या हाती तुतारी देऊन उमेदवारी देण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास भालके आणि इतरही स्थानिक काँग्रेस नेते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. म्हणून येथे मैत्रीपूर्ण लढतीचा काँग्रेसचा विचार आहे.

