राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत काटोल मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण अनिल देशमुख निवडणूक लढणार की नाही? असा प्रश्न देशमुख यांच्या विधानाने उपस्थित झाला.
अनिल देशमुख म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत काटोलची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र, काटोलमधून अनिल देशमुख लढवतील की, सलील देशमुख लढवतील, याबाबत आम्ही सर्व कार्यकर्ते वरिष्ठांशी बोलणार आहोत. दोघांबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्यानंतर 28 तारखेला फॉर्म भरून त्यादिवशी काटोलमधून कोण लढणार हे स्पष्ट करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. अनिल देशमुख यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ नावाचे एका पुस्तक येणार असून त्याविषयी बोलताना ते म्हणाले, मला खोट्या आरोपाखाली अडकवलेल्या पद्धतीचा सर्व उल्लेख पुस्तकात केला आहे. चांदीवाल आयोगाच्या अहवालाचा उल्लेखही पुस्तकात असणार, असे देशमुख म्हणाले. पुस्तक लवकर प्रकाशित होणार असून त्यामध्ये अनेक खुलासे होतील, असे देशमुख म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुखपृष्ठाचे अनावरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच अनावरण केले. अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करतानाच अँटिलिया प्रकरण, ईडी प्रकरण आणि विरोधकांचे आरोप यावरही अनेक गोष्टी लिहिल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रात ‘बुक बॉम्ब’ ठरणार का? या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अनिल देशमुख यांनी तत्कालीन गृहमंत्री असताना पडद्यामागच्या घटना या पुस्तकातून सांण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाच्या कव्हर पेजवर खळबळजनक आरोप कव्हर पेजच्या वर्णनात असे लिहिले आहे की, “होम मिनिस्टरची डायरी हे एक रोमांचकारी आत्मचरित्र आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ राजकीय नेते अनिल देशमुख यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक टप्पा उघड केला आहे. कोविडच्या काळात मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्याची घटना संपूर्ण देशाला हादरून गेली तेव्हापासून या संघर्षाची कहाणी सुरू होते. पुस्तकात पुढे लिहिले आहे की, “महाराष्ट्राचे गृहमंत्री या नात्याने देशमुख यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले, पण त्यांना राजकीय कटात गोवण्यात आले. जिथे भ्रष्ट पोलिस, विरोधी पक्ष आणि केंद्रीय यंत्रणांनी त्यांना लक्ष्य केले.’

