मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | महाराष्ट्रात अजितदादा पवार गटाचे नेते महादेव दबडे आपल्या अनोख्या कामामुळे चांगलेच चर्चेत आल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिले. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी युवक अध्यक्ष राजू शेख, हर्षल सावंत, विपुल झेंडे , सुयश गुरव, नरेंद्र दबडे, विठ्ठल पोळ, दयानंद नागराळे, बसवराज देवरमणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नुकताच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुर्घटनाग्रस्त झाला. ही बाब अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व जनतेत संताप आणणारी आहे.
केवळ आठ महिन्यात येथील पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. येथे पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे महादेव दबडे यांनी सांगितले.