नालेसफाईचा फार्स तसेच अंकलीकडे जाणार्या नाल्याची सफाई न केल्यामुळेच शामरावनगरमध्ये मोकळी जागा, रस्त्यावर पाणी साचून राहिले असल्याकडे माजी नगरसेवक अभिजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक व नागरिकांनी लक्ष वेधले.
यावेळी त्यांनी साचलेल्या पाण्यात उतरून आंदोलन केले व महापालिका प्रशासनाचा निषेध केला. अधिकार्यांच्या दालनात साचलेले घाण पाणी ओतण्याचा, अधिकार्यांना या घाण पाण्याचा अभिषेक घालण्याचा इशाराही दिला.
येथील कालिकानगर, गंगोत्रीनगर, कुंभार प्लॉट, सिद्धिविनायक कॉलनी, अनमोल कॉलनी परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात साचलेल्या पाण्यात उभे राहून आंदोलन केले. भोसले म्हणाले, या भागातील नालेसफाईचा फार्स उघडा पडला आहे. दरवर्षीइतकाच म्हणजे दीड कोटी रुपयांचा खर्च करूनही काही भागात रस्त्यावर पाणी थांबून आहे. शामरावनगरचे पाणी वाहून नेणारा अंकली नाला यावेळेस साफ केला नाही. महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवून यातून काढता पाय घेतला. इतर ठिकाणी असलेली नालेसफाई पुरेशा गांभीर्याने झाली नाही. त्यामुळे आज अनेकांच्या घरादारात, रस्त्यावर पाणी आहे. जेसीबी, पोकलेन मशीन, क्रॉस पाईप आणि मुरूम यासाठी मी व रज्जाक नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आयुक्त शुभम गुप्ता यांनी वेळोवेळी सकारात्मक भूमिका दाखवलेली होती, परंतु त्यांच्या अखत्यारीतील यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून येते.
भोसले म्हणाले, आठवडाभर आयुक्त सुटीवर आहेत. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु त्यांनी दिलेल्या सूचनांबाबत प्रशासनाकडून गंभीरपणे घेतले जाते की नाही, हे कळत नाही. महापालिकेचे दोन्ही उपायुक्त गंभीरपणे भूमिका घेत नाहीत. शहर अभियंत्यांचे त्यांच्या विभागावर नियंत्रण नाही. आरोग्य अधिकारी नागरिकांच्या प्रश्नावर इकडे फिरकायला तयार नाहीत. येत्या काळात शामरावनगरमधील प्रश्न निकाली न निघाल्यास साचलेल्या पाण्यात महापालिका अधिकार्यांचे कटाऊट लावू, अधिकार्यांना या पाण्याचा अभिषेक घालू, प्रसंगी हे पाणी अधिकार्यांच्या दालनांत ओतू.असा इशारा अभिजित भोसले यांनी दिला आहे.