कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडावर हिंदुत्ववादी संघनांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हिंसाचारानंतर राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी लेखक आणि माजी आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशाळगडावरचा बाबा कोण? तो दर्गा कोणाचा? रेहानचा की मलिक उतगुजारचा? खरी हकीगत काय आहे आणि ब्रिटिश कागदपत्रातले पुरावे काय म्हणतात, यावर विश्वास पाटील यांनी सविस्तर पोस्ट करत माहिती दिली आहे.
विश्वास पाटील लिहितात,’१८८६ साली ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये पान क्रमांक ३२२ वर प्रसिद्ध केल्याप्रमाणे तेव्हाच्या विशाळगडावर १७ फूट लांब, पंधरा फूट रुंद आणि आठ फूट उंचीचा दर्गा होता. त्याची देखरेख करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून नऊ पाउंड म्हणजेच त्यावेळीच्या दरानुसार ९० रुपयांचा खर्च केला जात असे. हा दर्गा हजरत मलिक रेहान पीर यांचा आहे. तिथे दरसाल उरूस भरतो. त्या उरसाला ३०० ते ४०० भाविक हजर असतात. या जागृत ठिकाणाला मुसलमान तसेच हिंदू भाविकही भेट देतात अशा स्पष्ट नोंदी आहेत.’
इथे पूर्वी पंतप्रतिनिधींचा वाडा होता. तसेच भोज राजाने ६४०० स्क्वेअर फुटांचा एक तलाव बांधला होता. शिवाय अर्धचंद्राच्या आकाराचा १७ बाय १५ बाय ८ फुटांचा आणखी एक तलाव आहे. हा दुसरा तलाव रामचंद्रपंत अमात्य यांनी बांधून घेतला होता, अशी माहिती विश्वास पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.