सांगली प्रतिनिधी – जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या लोकांना आता कर्नाटकात तसेच मुंबई, नवी मुंबई जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, महाराष्ट्र भाजप रेल प्रकोष्ठ अध्यक्ष कैलास वर्मा, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दैनंदिन गाडी क्रमांक 17318 दादर-हुबळी एक्सप्रेस व 17317 हुबळी-दादर एक्सप्रेसच्या थांब्याचे उद्घाटन रविवार दिनांक 7 जून रोजी रात्री साडेनऊ वाजता झाले.

किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर कर्नाटकातील बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी येथे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा,अशी मागणी किर्लोस्करवाडी परिसर व जिल्ह्यातील जनतेची गेल्या पंधरा वर्षांपासून मागणी होती. मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हा थांबा मिळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील रेल सल्लागार समितीचे सुकुमार पाटील, उमेश राहा, रोहीत चिवटे, संदीप धाईंजे, चंद्रकांत जाधव, जीवन आप्पा नार्वेकर, डॉक्टर चंद्रशेखर माने, अजित लेंगरेकर, रोहित गोडबोले इत्यादींनी प्रयत्न केले.
या थांब्याचे उदघाटन पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार विशालदादा पाटील, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रवाशी उपस्थित होते.

