इस्लामपूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – राजकीय अनास्थेमुळे पाण्याअभावी पलूस, वाळवा, तासगाव तालुक्यांतील 45 गावांमधील 13 हजार 366 हेक्टर क्षेत्रातील पिके वाळू लागली आहेत. शेतकरी पाणीप्रश्नावर टाहो फोडत असताना प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात समाधान मानत आहे.याबद्दल शेतकऱयांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सांगली जिह्यात सर्वच तालुक्यांत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. जिह्यात दुष्काळाची भयावह अवस्था पाहायला मिळत आहे. सांगली जिल्हा राज्य शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केला आहे; पण प्रत्यक्षात कुठेही दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात नाहीत. राज्यकर्ते आणि प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शेतकरी दुष्काळाचे चटके सहन करीत आहेत. पलूस, तासगाव, वाळवा तालुक्यांत दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. काही गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे.
कृष्णा व आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याची राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून केवळ घोषणाच होत आहे. पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱयांवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पलूस तालुक्यात तुपारीपासून वसगडेपर्यंतच्या शेतीला वरदान ठरलेल्या कृष्णा कालव्यातही पाणी सोडण्यासाठी सातारा जिह्यातील काही लोकप्रतिनिधी टाळाटाळ करीत असल्यामुळे ‘जलसंपदा’चे अधिकारीही हतबल झाले आहेत.
द्राक्ष, केळीच्या बागा धोक्यात
पलूस तालुक्यातील द्राक्षबागा, ऊस, केळी आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱयांनी मंत्री, लोकप्रतिनिधी, पाटबंधारे अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदने दिली, चर्चा केली, आंदोलने केली, तरीही कालव्यात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे या भागातील द्राक्षबागा, केळी, ऊस पाण्याअभावी वाळून चालला आहे.

