राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांचे भाचे आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, नेमकी चर्चा काय सुरू आहे?
जयंत पाटील एकटे जाणार की “सगेसोयरे” यांना घेऊन जाणार असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला आहे. जयंत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केलं आहे असं देखील ते म्हणाले. आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. भाजप म्हणत की येऊ घातलेल्या निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू तर त्यांचे मूळ भाजपचे किती लोक आहेत हे त्यांनी सांगावं. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले किती लोक आहेत, हेही सांगावं असा टोला प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे.
निवडणुकीवर काय म्हणाले ?
नगरपालिका ,महानगरपालिका, जिल्हा परिषद, यांचे मागच्या दोन वर्षापासून इलेक्शन झालेले नाहीत. या सर्व संस्था प्रशासक चालवत आहेत, जनतेतून आलेले प्रतिनिधी तिथे नाहीत. तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी एक चर्चा ऐकली आहे की राज्यातील सहकार विभाग असा एक कायदा आणू पाहतय की, या संस्थांमधील संचालक मंडळ बरखास्त करून या सर्व संस्था अधिकाऱ्यांमार्फत चालवल्या जाणार आहेत तसं एक विधेयक येणार असल्याची चर्चा सुरू आहे असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील की नाही अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत आहे अस देखील तनपुरे यांनी म्हटल आहे.
भाजपचे लोक ठेकेदारांना खंडणी मागतात?- तनपुरे
अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश महसुली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे अशात पाणीपुरवठा योजनेची वीज कनेक्शन कापू नयेत असे आमचे माफक अपेक्षा आहे. याबाबत आम्ही टंचाई आढावा बैठकीत वारंवार विषय मांडत आहोत, मात्र अधिकाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे गेल्या आढावा बैठकीमध्ये आम्ही जे विषय मांडले त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. उलट ज्या नवीन योजना माझ्या मतदारसंघात सुरू आहेत, त्याला भाजपचेच काही कार्यकर्ते आडवे येत आहेत आणि ठेकेदारांना खंडणी वगैरे मागत असल्याचा आरोप प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. पालकमंत्री तिकडे बैठका घेतात मात्र त्यांचे कार्यकर्ते असे आडवे येत असतील तर योग्य नाही असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटल आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था –
राज्यातील गोळीबार आणि राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून हे बेकायदेशीर सरकार असल्याच त्यांनी म्हटलंय. यांच्या सरकारमधील आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालत आहे, तर कोणी फेसबुक लाईव्ह करून गोळी झाडत आहे. इकडे राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या झाली त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले असल्याची अशी टीका तनपुरे यांनी केली आहे. तर महाराष्ट्राचा बिहार नाहीतर बिहारचा महाराष्ट्र करायचा का? असे लोक म्हणतील अशी उपरोधी टीका त्यांनी केली आहे. प्रभू श्रीराम सत्तेला लाथ मारून वनवासात गेले होते मात्र इथे सत्ता पाहिजे म्हणून सगळे वचन मोडून एकत्र हे राजीनामा देऊ शकत नाही हे सत्तेला हापापलेले असा घनाघात तनपुरे यांनी केला आहे.

