Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार ही तुतारी घेऊन दिल्लीचे तख्त हदरवणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी एसपी पक्षाने दिला आहे.
त्यामुळे आगामी काळात शरद पवार सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी कोणते डाव टाकणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सात दिवसांत शरद पवारांच्या पक्षाला चिन्हे देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने कार्यवाही करत गुरुवारी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यानंतर पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी एल्गार पुकारला आहे. तुतारीच्या मदतीने शरद पवार दिल्लीच्या तख्ताला हदरे देणार असल्याचा इशाराच पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, खासदार शरद पवारांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार आहे!, असे पक्षाच्या वतीने म्हटले आहे.
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
जितेंद्र आव्हाडांनी आता थांबायचे नाही, लढायचे अशी घोषणाच केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षास निवडणूक आयोगाने एका योद्ध्याच्या हाती तुतारी दिली आहे. ही तुतारी घेऊन 84 वर्षांचे शरद पवार परत एकदा लढाईला उतरलेत. हा संकेत वेगळाच संदेश देऊन जातो. महाराष्ट्र युद्धासाठी तयार आहे. युद्ध अधर्माविरूद्ध आहे.. अन् या युद्धाची तुतारी वाजवायचे काम निवडणूक आयोगानेच केले आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.

