सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – कोल्हापूर- सांगली महामार्गावरील उदगाव (ता.शिरोळ) गावच्या हद्दीत कृष्णा नदीवरील पुलावरून भरधाव कार संरक्षक कठडे तोडून खाली कोसळली. रविवारी (ता.७) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटनेतील दोघा जखमींवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उदगाव येथील कृष्णा नदीवरील पुलावरून चारचाकी वाहन सांगलीकडे जात होते. यावेळी वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने कृष्णा नदीच्या पुलाचा कठडा तोडून चारचाकी कृष्णा नदीच्या पात्रात कोसळली. वाहन कोसळल्यानंतर वाहनातील एअर बॅग खुली झाल्याने सुदैवाने दोघांचा जीव वाचला. अहमदनगर येथील दोघे यात जखमी झाले. घटनास्थळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. त्यांनतर शासकीय रुग्णवाहिकेतून सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे सांगली- कोल्हापूर महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, २०१६ साली अशा प्रकारचा व याचठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी वाहन पुलाच्या कठड्याच्या टोकावर अंतराळी अडकले होते. अशाच प्रकारे आज अपघात झाल्याने ‘त्या’ अपघाताची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

