इचलकरंजी प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | इचलकरंजी शहरात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते. विविध राज्यातील लोक उद्योग – व्यवसायासाठी येथेच राहतात. अशांनी मराठी आपलीशी केली आहे. डीकेएएससी महाविद्यालयात या बहुभाषकांची मुले-मुली शिक्षण घेतात. या मुलांनी सादर केलेले भाषिक अविष्कार भारतीय भाषा दिवस सार्थ ठरवणारे आहेत, असे गौरवोद्गार डॉ. प्रतिभा पैलवान यांनी काढले.
येथील डीकेएएससी महाविद्यालयात महान साहित्यिक चिन्नास्वामी सुब्रमण्यम् भारती यांची जयंती अर्थात भारतीय भाषा दिवस उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर होते. विद्यार्थ्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, भोजपुरी, मारवाडी, कानडी, मालवणी, कोकणी, वऱ्हाडी, बंगाली आदी भाषा व बोलीभाषांमधील अभिवाचन, कथा, कविता, एकपात्री, नाटिका, प्रहसन, गाणी अशा विविध प्रकारांमध्ये सादर केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ मणेर म्हणाले, ‘भाषा माणसांना जोडण्याचे कार्य करते. आपले-परके असे भाषेत काही नसते. मानवी संवादाचे माध्यम असणाऱ्या भाषेमधून आपण व्यक्त झाले पाहिजे.’ डॉ. डी. सी. कांबळे, प्रा. डी. ए. यादव, डॉ. सुनिता वेल्हाळ, अंजली उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत समृद्धी निकम यांनी केले. प्रास्ताविक सरगम पोवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय योगिता सोनटक्के यांनी करून दिला. सूत्रसंचालन संजीवनी कदम, प्रीती भिसे यांनी केले. आभार प्रेम मदीहाळी यांनी मानले.

