कोल्हापूर : शेजाऱ्यांचे घर बळकाविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारे त्यांना छळणाऱ्या क्षीरसागर यांनी घरात घुसून शेजाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
यामुळे पीडित वरपे कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर पिता-पुत्राच्या दहशतीचा आणि अत्याचारांचा पाढाच वाचला. न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू, असा इशारा वरपे कुटुंबीयांनी दिला आहे.
कोल्हापूर शहरातील शनिवार पेठेत ‘शिवगंगा अपार्टमेंट’मध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर कुटुंबीयांसह राहतात. क्षीरसागर यांच्या शेजारी महापालिकेत कर्मचारी असलेले राजेंद्र ज्ञानदेव वरपे कुटुंबीयांसह राहतात. आज राजेंद्र वरपे, त्यांच्या पत्नी, मुलगी सिद्धी आणि मुलगा शौर्य यांनी पत्रकारांसमोर क्षीरसागर यांच्याकडून होणाऱ्या छळाची कैफियत मांडली.
वरपे कुटुंबीयांनी सांगितले की, आपले घर बळकाविण्यासाठीच क्षीरसागर यांच्याकडून गेल्या दीड-दोन वर्षांपासून मानसिक छळ केला जात आहे. सामाईक टेरेसवर मध्यरात्रीपर्यंत दारू पाटर्य़ा करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. क्षीरसागर यांच्या दबावामुळेच त्यांनी मारायला पाठविलेल्या आणि सीसीटीव्हीची तोडफोड करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी आपल्या कुटुंबीयांनाच काही दिवसांसाठी राहते घर सोडून अन्यत्र राहण्यास पाठविल्याचा गंभीर आरोप वरपे कुटुंबीयांनी केला आहे.

