इचलकरंजी : सांगली जिल्ह्यात दामदुप्पटीचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीवर आता गावभाग पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये अरविंद मारुती गुरव (वय ४५), सीमा अरविंद गुरव (वय ४०, रा. शिरढोण, ता. शिरोळ) या पती-पत्नीसह नितीन गजानन माळी (४०, रा. इस्लामपूर) अशा तिघांचा समावेश आहे. त्यांनी एका महिलेची ९ लाख २० हजार ८०० रुपयांची फसवणूक करत बदनामी केली आहे. याप्रकरणी ज्योती प्रविण गोंडाजे (वय ४०, रा.कुपवाड, जि.सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओम साई होम अप्लायन्स कंपनीच्या कार्यालयात अरविंद गुरव, सीमा गुरव आणि नितीन माळी हे तिघे मिळून दामदुप्पटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून करारपत्र घेत होते. अशाच पद्धतीने जादा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवत तिघांनी ज्योती गोंडाजे यांचा विश्वास संपादन केला. गोंडाजे यांनी रोख स्वरूपात ९ लाख २० हजार ८०० रुपये गुंतवले होते. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भरलेली रक्कम देण्यास तिघांनी सतत टाळाटाळ केली. भरलेल्या रक्कमेबाबत विचारणा केल्यावर गोंडाजे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली जात होती.
तसेच बदनामीही सुरू केली होती. त्यामुळे फसवणूक आणि बदनामी करत असल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गोंडाजे यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून कसून तपास..
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अरविंद गुरव याने अनेकांना गंडा घातल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गुरव आणि नितीन माळी या दोघांवर विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

