Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री पंढरपू्रच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.
तर, मानाचे वारकरी हा मान गेल्या 15 वर्षांपासून न चुकता वारी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना मिळाला. या दाम्पत्याने देखील पूजेत सहभाग घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे शासकीय महापूजा संपन्न झाली. उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली. या पूजेसाठी फडणवीस दाम्पत्य बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते. शासकीय महापूजे दरम्यान, श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक, मंत्रोपचारात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. तर, यावेळी नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला आहे. पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.
मंदिराची मनमोहक सजावट
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने नेहमी प्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. यात आकर्षक विद्युत रोषणाईसह विविध प्रकारची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विठ्ठल मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या 5 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुणे येथील राम जांभूळकर या भाविकाने ही फुलं दिली आहेत. ज्यात एकूण 22 प्रकारच्या पाना फुलांचा वापर करण्यात आले असून, यासाठी तीन दिवसांपासून 35 ते 40 कामगार काम करत होते.
विरोध आणि चर्चा
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. त्याच हा प्रश्न आद्यापही सुटलेला नाही. अशात यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये अशी भूमिका घेत मराठा समाज बांधवांनी घेतली होती. तर प्रलंबित मागण्यांसाठी कोळी समाजाने देखील उपमुख्यमंत्र्यांना विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने आंदोलकांची समज कढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करत आंदोलकांची बैठक घेतली. आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. सोबतच त्यावर तोडगा काढण्याचा आश्वासन दिले. यासह फडणवीसांसोबत बैठकीची मराठा समाजाच आंदोलकांची मागणी देखील मान्य केल्याने मराठा समाज बांधवांनी विरोध मागे घेतला.

