.
सांगली जिल्ह्यात चोऱ्या , घरफोड्या, खून , मारामाऱ्या हे दैनंदिन व नित्याचे झाले आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विचित्र प्रकारे वेगळ्याच कारणाने युवकाची हत्या करण्यात आली. पोलीस ठाण्याचा गोपनीय विभाग इतका पॉवरफुल आहे की नेहमीच तो फुल्ल असतो.खून होवून चार दिवस झाले तरी त्याला कानोकानी खबर सुध्दा लागत नाही. कवठेमहांकाळ पोलीस प्रशासनाच्या या “आपल्याच तंद्रीत” कारभाराची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यात गाजली. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेच्या कारभाऱ्याला बोलावून त्याची विशेष ओळख व मुलाखत करून घेणं अत्यंत गरजेचे आहे. असे नागरिक कवठा तहसील कार्यालयाच्या आवारात बिनधास्त बोलत होते.
कवठेमहांकाळ : खबऱ्या प्रतिनिधी / महिलांच्या फोटोखाली आक्षेपार्ह मजकूर लिहून व्हॉटस्ॲपच्या स्टेटसला ठेवणे, तसेच अश्लिल मेसेज मोबाईलवर पाठविणे, याचा राग मनात धरुन कवठेमहांकाळ शहरातील पाच जणांनी सुशिल सुर्यकांत आठवले (वय २३) या तरुणाचा अपहरण करुन लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करत खून केला होता.
पोलिस पथकांच्या अथक शोधानंतर तब्बल सातव्या दिवशी आज (दि.१०) सुशिल याचा मृतदेह लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) च्या हद्दीत बोगद्यातून गेलेल्या म्हैसाळ योजनेच्या कालव्यात सापडला.
याप्रकरणी पाच संशयित आरोपी यापूर्वीच अटकेत आहेत. पण आणखी काही जणांचा गुन्ह्यामध्ये समावेश असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासात त्यांची नावे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर पण खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली आहे.
कवठेमहांकाळ शहरामधील एका २३ वर्षीय तरुणाचा खून करुन मृतदेह म्हैसाळ योजनेच्या कालव्यात टाकण्यात आला आहे, अशी चर्चा बुधवारी (दि. ४) कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात सुरु झाली होती. दरम्यानच्या काळात कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी गुरुवारी (दि. ५) स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर होत आपण खून केला असल्याची कबुली दिली. परंतु मृतदेह सापडला नसल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला नव्हता.