मुंबई : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. असे असले तरी आणखी चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबर पासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहेत. 11 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर संप केला जाणार आहे. याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात संप केला जाईल, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
राज्य सरकारने नुकताच एक जीआर काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या माहागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यावरुन 38 टक्के झाला आहे. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता 42 टक्के करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे.
तसेच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने 11 सप्टेंबर पासून संप करण्यात येणार आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर 13 सप्टेंबर पासून राज्यातील जिल्हास्तरावर हे आंदोलन केले जाईल असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने काढण्यात आले आहे.

