आष्टा : खबऱ्या प्रतिनिधी/ येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्र गावातील सज्जे अधिकारी, तलाठ्यांच्या खाबुगिरीचे अड्डे बनत आहेत. दीड महिन्यात नायब तहसीलदार, महसूल सहायक आणि नुकतेच सापडलेले फाळकेवाडीचे तलाठी यांच्यावरील ‘लाचलुचपत’च्या कारवाईने आष्टा अप्पर तहसीलमधील महसूलचा वसूल चर्चेत आला आहे.
एजंटगिरी, कमिशनवारी आणि पाकीटधाडीने, कोणाचा कोणाला पायपूस नाही, असेच चित्र आहे. अधिकाऱ्यांचा धाक, जरब नाही. कर्मचारी, तलाठ्याना त्याचा फरक नाही. नोंदीपासून डिजिटल सातबारा वरील फेरफार दुरुस्तीपर्यंत जनतेची नुसती लूट सुरू असल्याचे चित्र आहे. कारभार सुधारा.. अन्यथा अधिकारी बदला.. असा सूर जनतेतून उमटत आहे. अप्पर तहसील कार्यालय भाडेतत्वावर इमारत, जागेच्या हस्तांतरण, लोकांची होत नसलेली कामे, नागरिकांचा संताप यासह अनेक विषयांनी गाजत आहे. जनतेतून मागणी होऊन देखील कारभारात बदल होताना दिसत नाही. अप्पर तहसील मधील कर्मचारी तलाठीपासून अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीला जनता वैतागली आहे. या विरोधात लोकच आता लाचलुचपतचे दरवाजे ठोठावत आहेत. त्यातूनच मागील महिन्यात अप्परचा सिंघम बाजीराव पाटील, महसूल सहायक या दोघांवर कारवाई झाली. कारवाईने कारभार सुधारेल अशी जनतेची आशा होती. मात्र अधिकाऱ्यांच्या ‘येरे माझ्या मागल्या’ कारभाराने ती फोल ठरली. भडकंबे, नागाव, पोखर्णी परिसरातून बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरूच आहे.
‘पावती रॉयल्टी नावाला अन उपसा गावाला..’ अशा कारभारातून कोट्यवधीचा मुरुम गायब होत आहे. हे अधिकाऱ्यांना दिसत नसेल का? असा प्रश्न जनता उपस्थितकरीत आहे.
शेतकऱ्यांची लूट…
चावड्यात कामांचा दर ठरलेला असून, डिजिटल सातबारा, फेरफार नोंदणी, दुरुस्तीपासून प्रत्येक कामातील नोंदणीसाठी शेतकऱ्यांची लूट होत आहे. याचे द्योतक फाळकेवाडी येथील तलाठी गुरव याने सातबारा दुरुस्ती नोंदणीसाठी सहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई झाली. महिन्यात कारवाईने तिघांवर धाड पडल्याने ‘अप्पर तहसील’च्या कारभाराचा पंचनामा होत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातीलच नव्हे, तर मतदारसंघातील हा महसूलचा वसूल चर्चेचा ठरत असून, पालकमंत्री पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.