“अश्रूंचे बांध फुटुनी, हृदय येते भरुन. बापू तुम्ही जाल इतक्या लवकर निघुनी ; न्हवते स्वप्नीले कधी कुणी!”
ज्या माणसकड बघून कळायचं की मितभाषी काय असतं,संयम काय असतो,मनाच्या कोपऱ्यात दुःखाच कितीही काहूर असल तरी चेहऱ्यावर हास्य कसं ठेवायचं हे तुम्हा-आम्हाला शिकविणारा आपल्या सर्वांचा लाडका संदेश बापू दंडवते आपल्याला सोडून गेला.काल सकाळी ‘मॉर्निंग वॉकला’ जात असताना अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली.अपघात इतका भीषण होता की दवाखान्यात नेईपर्यंतच बापूंची प्राणज्योत मालवली.
कुणाला काहीच कळत नव्हत,बऱ्याच जणांचा विश्वासच बसत नव्हता की बापू आपल्याला सोडून जातील त्यावर,अनेकांची फोनाफोनी चाललेली ,हिंगणगावातल्या पोरांची दवाखान्यात धावपळ चाललेली.नंतर,अनेकांच्या व्हॉट्स ऍप स्टेटसची जागा बापूंच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कॅप्शनने घेतली.
बापूंच्या त्या सगळ्या फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होत पण,बापूंना ओळखणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आसव होती.अनेकजण ओक्साबोकशी रडत होती.प्रत्येकाला आपल्या कुटुंबातला व रक्तातला माणूस गेल्यागत आज वाटल.हे मी स्वतः अनुभवल.बापूंच्या अंत्यविधीला जो लोकांचा जनसागर लोटला होता त्यावरून कळत या माणसाने काय कमावल होत ते.पक्ष-जात-गट यापलीकडे बापूंनी जी माणुसकी जपली होती त्याचीच साक्ष लोकांची गर्दी सांगत होती.लोकांच्या बोलण्यातून त्यांचं मोठेपण काय होत ते कळत होत.सुप्रसिद्ध आनंद सिनेमातल्या राजेश खन्नाच्या डायलॉगप्रमाणे जणू बापूच म्हणत असल्याचा फील आला की आपण आयुष्य किती जगतोय यापेक्षा ते कस जगतोय हे महत्वाचं आहे.बापू फार अकाली आपल्याला सोडून गेले.पण एवढ्या कमी आयुष्यातदेखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा मोठ्या हिमतीने फडकविला होता.गरीब कुटुंबात जन्म होउनदेखील आपल्या मेंदू आणि मनगटाच्या जोरावर त्यांनी अनेक संकटांवर मात करत आपल अस्तित्व निर्माण केलं.सुरुवातीच्या काळात पडेल ती काम केली.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी बापूंची महानंद दूध संघावर “संचालक” म्हणून म्हणून त्यांची निवड केली.अगदी तिशीत असलेल्या बापूंसाठी हे सगळं नवींनच होत.आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी आमदार रामदादा वरकुटे.माजी मंत्री सुरेश धस,कोपरगावच्या स्नेहलता कोल्हे अशी मात्तबर लोक त्यावेळी महानंदची संचालक होती.त्यांच्या पंक्तीत आपला बापू जाऊन बसला होता.आपल्या पदाचा वापर योग्य आणि आपल्या लोकांसाठी करायचा ही जाणीव ठेऊन त्यांनी कामे केली.भागातला माणूस आला की आपल्या खुर्चीवर त्याला बसवायचं हे आज लोक अगदी गहिवरून सांगत होती.महानंदची मीटिंग असली की एसटी आणि ट्रवल्सने जाणारा कदाचीत हा एकमेव संचालक असावा.बापूंनी स्वतःच्या पदाचा फायदा घेत घरच्या तुंबड्या भरल्या नाहीत.मागच्या ग्रामपंचायत बॉडीत बापू उपसरपंच पण होते.नुसती हिंगणगावातलीच नव्हे तर सगळ्या तालुक्यातील अनेकांची प्रशासकीय व इतर कामे बापू हिरिरीने करायचे.
सावळा चेहरा,चांगली तब्येत,अंगावर असलेला पांढरा शर्ट व साधी फॉर्मल पँट असा पेहराव असलेल्या बापूंच्या शाइन या गाडीवर एखाद्या माणूस बसवून त्याच्या कामासाठी कडेगावच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बापू हमखास दिसायचे. दिसल्यावर हाक मारून हसतमुख चेहऱ्याने चहाचा आग्रह करायचे.अगदी १०-१५ मिनिटाच त्यांच्याशी बोलणं व्हायचं पण त्यांच्या बोलण्यात एक उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा होती.त्यामुळे मन अगदी प्रफुल्लीत व्हायचं.अनेक सामाजिक-राजकीय गोष्टींवर चर्चा व्हायची.माझ्या कधीच पाहण्यात नाही की बापू कधी कुणाला चढ्या आवाजात बोलले.प्रचंड ओघवती आणि विनम्र अस बोलणं त्यांचं असायचं.जशा माझ्या आठवणी तशा अनेकांच्या हजारो आठवणी आपल्या सगळ्यांच्या आहेत.बापूंच अस अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबांची न भरुन निघणारी हानी झालीच आहे. सोबतच, त्यांच्यासोबत जोडला गेलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बापूची पोकळी निर्माण झाली आहे.
–आता कर्तव्य आपल-
संदेश बापूंच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा खांबच कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.मोठा आघात त्यांच्या कुटुंबावर झाला आहे.त्यांच्या आईचा,पत्नीचा व पोरांचा आक्रोश खरच हृदय पिळवटून टाकणारा होता.त्यांचं दुःख आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही .ते यातून बाहेर पडतील की नाही हेही माहीत नाही.बापूंच्या घराच काम पैशाअभावी अर्धच बांधकाम होऊन पडलंय.त्यांची मुलगी ७ वी तर मुलगा ३री ला आहे. पोरांच्या फी च पण टेन्शन त्यांना असल्याच त्यांनी काही जणांकडे बोलून दाखवल होत.चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा दवाखान्याची जबाबदारी बापूंच्याच खांद्यावर होती.मागच्या काही काळापासून ते याच विवंचनेत होते.आता या सगळ्या गोष्टीं पार पाडताना त्यांच्या कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.घरचा कर्ता माणूस गेल्याच दुःख हे त्या कुटुंबालाच माहिती .बापूंचा जो अपघाती मृत्यू झाला त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर जी कारवाई व्हायची ती होईल अथवा अन्य काही हे सर्वस्वी बापूंच्या कुटुंबाचा निर्णय असणार आहे.
परंतु,काल बापूंना आदरांजली व्यक्त करताना मी म्हटलं की ,बापूंच्या कुटुंबावर जो न भरुन निघणारा आघात झालाय.जे कुटुंब कोसळलंय त्यांना आपण आपलं कर्तव्य म्हणून ज्याला जेवढं शक्य आहे त्यांनी आर्थिक सहकार्य करुन आपलं कर्तव्य पार पाडाव.आणि हीच बापूंना खरी आदरांजली ठरणार आहे.आपणा सर्वांना विनंती आहे की ,या सगळ्या भावना समजून आपण त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य करुन आपल्या सहवेदना दाखवून देऊयात आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं दाखवून देऊ.
खाली दिलेल्या त्यांच्या पत्नीच्या बँक अकाऊंट व गूगल पे/फोन पे नंबर देण्यात येईल.त्यात आपल्याला शक्य असलेली आर्थिक मदत करावी.
सुष्मिता संदेश दंडवते
Bank of Maharashtra
Ac no-60167481266
IFSC code-MAHB0001636
Gpay/phone pay-8379845555
चेतन सावंत(संपादक,स्पेशल गोष्ट)-9766934158

