मुंबई (खबऱ्या प्रतिनिधी) : राज्यातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन ४८ जागांवरील ग्राऊंड रिॲलिटीचा सर्वे काँग्रेसने केला असून, त्याद्वारे दावा करण्यात आला आहे, की शिंदे-फडणवीस-पवार अशी तिहेरी मोट बांधूनही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. एकूण ४८ मतदारसंघांपैकी ४० ते ४५ जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा निष्कर्ष सर्वेच्या आधारे काढण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतून शिंदे गट फोडला व राज्यात सरकार स्थापन केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला आहे. असे असूनही अपेक्षित यश मात्र भाजपाला मिळणारच नाही, असे सर्वेतून समोर आले आहे. सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हवेत असून, ते म्हणाले, की सर्वेत ४८ मतदारसंघांत जाऊन तेथील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यातील भाजपविरोधी पक्षांशी आम्ही युती करू. सर्व पातळ्यांवरून आम्ही भाजपला उखडून फेकणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही. ते मोठे नेते आहेत. निर्णय घेण्यास सक्षम आहेत. इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, असे पटोले म्हणाले. मोदी सरकार देशातील आर्थिक स्थिती नीट हाताळू शकले नाहीत. त्यामुळेच महागाई वाढली आहे. मात्र महागाईचे खापर मात्र परदेशावर फोडून मोदींनी हात वर केले आहेत. मोदी पुन्हा येणार अशी घोषणा करतात. मात्र लोकशाहीत असा अहंकार चालत नाही, असे पटोले म्हणाले.