मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता आणखी एक पक्ष फुटीच्या तोंडावर उभा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे बंडाच्या तयारीत आहेत, त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पक्षातंर्गत संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आमची कार्यकर्त्यांचीच आहे. वीस वर्षे आम्ही संघटनेत काम करतोय, असं तुपकर यांनी म्हटलं आहे. तुपकर यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
रविकांत तुपकरांच्या भूमिकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खळबळ उडाली आहे. रविकांत तुपकर यांच्या या वक्तव्यानंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता रविकांत तुपकर वेगळी भूमिका घेण्याआधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत राजू शेट्टी मोठा निर्णय घेण्याची शक्यात आहे. दरम्यान गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केले, त्यामुळे राष्ट्रवादीत देखील मोठी फूट पडली आणि आता रविकांत तुपकर हे बंडाच्या तयारीत आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पक्षातंर्गत संघर्ष पहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होते आहे.

