शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे सध्या वादात सापडले आहेत. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद गांधी नव्हते तर ते मुस्लिम जमीनदाराचे पुत्र होते, असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात केले.
त्यानंतर अमरावतीत त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंद झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलनही सुरू केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात सापडले होते.
संभाजी भिडे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे होय. त्यांचे मूळ नाव मनोहर असे आहे. भिडे यांचे काका बाबाराव भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख कार्यकर्ते होते. १९८०च्या दशकात संभाजी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सांगलीत कार्यरत होते, असे बीबीसी हिंदीने दिलेल्या बातमीत म्हटलेले आहे. पण याच काळात त्यांचे संघाशी मतभेद झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीला संचलन आयोजित करते. तर भिडे दुर्गामाता दौड आयोजित करतात.
शिवप्रतिष्ठानची स्थापना कधी झाली?
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना १९८४ला झाल्याचे संघटनेच्या वेबसाईटवर म्हटले आहे. रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद आंदोलनात संभाजी भिडे यांच्या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. ‘हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,’ असे भिडे वारंवार सांगतात. भिडे सांगलीतील गावभागात राहातात, आणि त्यांची राहणी साधी असल्याचे त्यांना ओळखणारे लोक सांगतात. तसेच भिडे हे नेहमी अनवाणी चालतात. रायगडावर ३४ मण सोन्याचे सिंहासन बसवण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठानने केला आहे. २०१४ला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भिडे यांची रायगडावर भेट झाली होती.
जोधा अकबर चित्रपटाला विरोध आणि हिंसाचार
२००९ला रिलिज झालेल्या जोधा अकबर चित्रपटला भिडे यांनी विरोध केला. या आंदोलनाला कोल्हापूर, सांगली आणि जवळपासच्या भागात हिंसक वळण लागले होते.
संभाजी भिडे आणि वाद
संभाजी भिडे यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. नोव्हेंबर २०२२ ला एका महिला पत्रकाराला आधी टिकली लाव मग तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो असे वक्तव्य केले होते. तर १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिन नाही, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. २०१७मध्ये पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.