पुणे : पुण्यातील प्रसिद्ध आणि मोठी बँक असलेल्या भारती सहकारी बँकेवर सायबर अटॅक करण्यात आला आहे. खातेदारांच्या डेबिट कार्डचे क्लोन तयार करून पुण्यासह, मुंबई, दिल्ली, सांगली, कोल्हापुरातील खातेदारकांच्या खात्यातून तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाला आहे. भारती सहकारी बँकेच्या विविध एटीएममधून ४३९ क्लोन केलेल्या एटीएम कार्डच्या साहाय्याने १ कोटी ८ लाखांची रक्कम काढून घेण्यात आली. ही रक्कम १२४७ ट्रान्सजॅक्शनद्वारे काढण्यात आली आहे. याप्रकरणी बँकेच्या वतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला तरी बँकेला याची कल्पना नव्हती.
भारती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील (६२, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. १७ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती सहकारी बँकेची सदाशिव पेठेत मुख्य शाखा आहे. येथील तसेच इतर ठिकाणच्या एटीएममधून क्लोन केलेल्या ४३९ एटीएम कार्डद्वारे १ कोटी ८ लाख १५ हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली. करोना काळात एटीएमची चीप बसवण्याच्या कामात उशीर झाल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याची शक्यता आहे. ही रक्कम भारती सहकारी बँकेची सदाशिव पेठेतील मुख्य शाखा, आकुर्डी, धायरी, धनकवडी, सांगली, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, मलकापूर, दिल्ली, इस्लामपूर, कोथरूड, वरळी, बाणेर व हडपसर येथील एटीएममधून काढण्यात आली. भारती सहकारी बँकेच्या राज्यात एकूण २३ शाखा आहेत. सन २०२२ च्या ऑडिटमध्ये ही रक्कम एटीएम फ्रॉडच्या नावाखाली कपात झाली होती. त्यामुळे बँकेस झालेल्या नफ्यातून सदरची रक्कम नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियामार्फतही कपात करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

