सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील,नंतरच्या काळात जयंतराव पाटील आणि प्रकाशबापू पाटील यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहेत.पण अलीकडच्या काळात 1999 नंतर वाळव्याचा वाघ (जयंत पाटील)शिराळ्याचा नाग(शिवाजीराव नाईक)हा संघर्ष खूप काळ चर्चेत होता.अगदी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पारावर त्याची चर्चा व्हायची.
१९९९ साली वाकुर्डे डावा कालवा या मुद्यावर पाटील आणि नाईक यांच्यात संघर्ष झाला.तेव्हा हे दोन नेते एकाच पक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते.पण दोघात सातत्याने वाद होत राहिला,टीका होत राहिली.यादरम्यान एका जेष्ठ पत्रकारांने जयंत पाटील यांना वाळव्याचा वाघ तर शिवाजीराव नाईक यांना शिराळ्याचा नाग ही उपमा दिली. ही उपमा या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा स्वीकारली.
जयंत पाटील जेव्हा शिराळा दौऱ्यावर जायचे तेव्हा त्यांचे कार्यकर्ते घोषणा द्यायचे’आलाय वाघ कुठाय नाग?”नाईक जेव्हा वाळव्यात यायचे तेव्हा त्यांचे कार्यकर्ते”आलाय नाग कुठाय वाघ?”असा जाब विचारायचे.
नाईक आणि पाटील यांच्यात सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहिले,याचदरम्यान तत्कालीन आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला,त्यात नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे नेते होते.सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला पण अयशस्वी ठरला.
त्यानंतर शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हाकलपट्टी झाली.२००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी दिली पण बाजी मारली अपक्ष शिवाजीराव नाईक यांनीच..
२००९ च्या दरम्यान त्यांनी काँग्रेस आय मध्ये प्रवेश केला.तेव्हा मानसिंगराव नाईक यांनी त्यांचा पराभव केला.
काँग्रेसच्या तालमीत जडणघडण झालेल्या शिवाजीराव नाईक यांनी २०१४ साली मात्र भाजप प्रवेश करत निवडणूक लढवली आणि जिंकले.पण भाजपमध्ये मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही,उपेक्षा झाली.२०१९ साली भाजपमधील बंडखोरीमुळे नाईक पराभूत झाले. त्यानंतर मात्र ते राजकीय पटलावरून थोडेसे बाजूला गेले.सतत चर्चेत राहणारा शिराळ्याचा नाग तोवर चर्चेच्या स्थानी राहिला नव्हता..
गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना पुन्हा स्वगृही परतीचे वेध लागले,त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल येणाऱ्या बातम्यांचे त्यांनी खंडन केले नाही.गुढीपाडव्याला त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलाय.या कार्यक्रमात त्यांनी केलेले भाषण आडबाजूला असलेल्या तालुक्यातील एक राजकीय कार्यकर्ता कसा घडतो,एक कार्यकर्ता घडत असताना त्यांना काय अडचणी येतात हे मांडले आहे. राजकारणात येऊ पहाणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असे भाषण केले आहे.
स्वाभिमानी, आक्रमक, आणि रक्तात बंडखोरी असलेले शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आहे.नागाच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने वाघाची ताकद किती वाढलीय?हे आगामी काळात दिसून येईल.या प्रवेशाने काही राजकीय समीकरणे तयार झालीत ती दिसतील.तोवर शिराळ्याच्या नागाला भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा.

