सांगली (प्रतिनिधी) : मणिपुरात माजी सैनिकाच्या पत्नीची नग्न धिंड काढली जाते, महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत, असे सत्य स्वीकारण्याची हिम्मत मोदींच्या छप्पन इंच छातीत नाही, मोदींना मणिपूर घटनेचे उत्तर देशाला द्यावेच लागेल, असे मत व्यक्त करीत विविध महिला संघटनांनी कॉंग्रेसभवन ते गांधी पुतळा मोर्चा काढला घोषणाबाजी करून केला निषेध व्यक्त केला.
काँग्रेस महिला आघाडी , राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी शिवसेना ठाकरेगट महिलाआघाडी, शेतकरी कामगार पक्ष या राजकीय संघटननबरोबर युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था,जिजाऊ ब्रिगेड, युवक क्रांती दल, घे भरारी महिला ग्रुप, सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना, घरेलू कामगार संघटना यांच्यासह विविध महिला संघटना यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी बोलताना प्रा.नंदा पाटील म्हणाल्या, ” आरएसएसची विचारसरणी ही महिलांच्या विरोधात असते, अनादी काळापासून महिलांवर हे प्रथम हल्ला करतात, मणिपूर राज्यात असणारी निसर्गसंपन्नता आपल्या उद्योजक मित्रांच्या घशात घालण्यासाठी निघालेला हा भस्मासुर आता गडायला हवा.” असेही त्या म्हणाल्या.
आशा पाटील म्हणाल्या, ” मणिपूर विषयी या सरकार बद्दल जितकी घृणा व्यक्त करावी तितकी कमी आहे. भाजप सत्तेत आल्यापासून महिलांच्याबाबतीत सगळीकडे दूषित वातावरण आहे, ज्या महिला खेळाडूंनी देशासाठी पदके आणली, त्यांनाच कुचलण्याचे काम या सरकारने केलं आहे, मणिपूर विषयी मोदी सरकरला उत्तर द्यावे लागेल.”
ज्योती अदाटे म्हणाल्या, ” मणिपूरमध्ये हजारोच्या संख्येने आलेल्या झुंडीने दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली आणि नंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. यातील एक महिला तर कारगिल युद्धामध्ये शौर्य गाजवलेल्या जवानाची पत्नी आहे. या घटनेला ७९ दिवस उलटून गेले तरी त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खबरबातही नाही म्हणे. केंद्रातल्या भाजप सरकारचेच हे वस्त्रहरण आहे.”
लिलावती जाधव म्हणाल्या ” अत्यंत चिड आणणाऱ्या या प्रकाराची जगभर निंदा झाली, त्यानंतर कुठे पंतप्रधानांना ३६ सेकंद बोलण्यासाठी जाग आली. भाजप सरकार आरोपींनाच पाठीशी घालत आहे. गेले तीन महिने तिथे हिंसाचार उसळलेला आहे, त्यात शेकडो महिलांच्यावर सामुहिक अत्याचार झाला आहे. शेकडो लोकांना गोळ्या घालून ठार केलेले आहे. त्याकडे ना पंतप्रधानांनी लक्ष दिले, ना गृहमंत्र्यांनी. ते निवडणुकीच्या चिंतेत आहेत.”
यावेळी प्रणिता पवार, रोहिणी पाटील, मालन मोहिते, तेजस्वीनी सूर्यवंशी, मिना शेशु, शितल मोरे, विद्या स्वामी, सुमन पुजारी, शेवंता वाघमारे, क्रांती कदम, प्रियांका तूपलोंडे, शोभा पवार, भारती पाटील आदी महिला कार्यकर्त्या व विविध संघटनांच्या महिला, युवती मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.
पुरुष कार्यकर्त्यांचा पाठींबा
महिला संघटनांच्या मोर्च्याला पाठींबा देण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विकास मगदूम नितीन चव्हाण, अमृतराव सूर्यवंशी, संभाजी पोळ, बाळासाहेब पाटील, मयूर पाटील, डॉ.संजय पाटील, अविनाश जाधव, निलेश पवार, संतोष पाटील, आनंदा लेंगरे, दिगंबर कांबळे आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

