यवतमाळ : सध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी मोठी जीवितहानी झाली आहे. बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. दरम्यान, आता यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे सुमारे 45 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे.
“यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.” असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसाने यवतमाळ शहराला झोडपून काढले असून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी पावसामुळे शेतीच तर मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर पुराचं पाणी गावात देखील शिरलं आहे. यवतमाळ शहराजवळ असलेल्या वाघाडी गावात पुराचे पाणी शिरले आहे.

