अनुसुचित जाती जमातीमध्ये प्रखर हिंदुत्ववादी म्हणून मातंग समाजाची ओळख आहे. परंतू महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजतागायत या समाजाला ना राज्यसभेवर ना विधान परिषदेवर संधी दिली गेली.
त्यामुळे राजकारणी मंडळी केवळ मतांसाठी या समाजाचा आणखी किती वर्षे वापर करणार आहेत, असा सवाल मातंग समाजातल्या तरुण, होतकरु आणि उच्चशिक्षित युवक-युवतींमधून उपस्थित केला जातोय. दरम्यान, राज्यसभेच्या काही जागा लवकरच रिक्त होणार आहेत.
त्यापैकी राज्यसभेच्या एका जागेवर या समाजातल्या कोणा एका व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा या समाजातल्या सर्वच घटकांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी कालखंडात या समाजाला संधी मिळाली नाही तर राजकीय उलथापालथ अटळ आहे, अशी चर्चा मातंग समाजातल्या नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
मातंग समाज हा काहीसा भाजपशी निगडीत आहे, असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. या समाजातली व्यक्ती स्वत:ची ओळख ‘हिंदू- मातंग’ अशी करुन देते. त्याचबरोबर अनेक हिंदू रितीरिवाज हा समाज पाळतो.
महाराष्ट्राच्या इतिहासात या राज्याच्या स्थापनेपासून मातंग समाज संधीची वाट पाहतो आहे. मात्र या समाजाला विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.
महाराष्ट्राची राजकीय गणितं पाहिली असता २९ जागा राखीव आहेत. मात्र या समाजाचे अवघे दोनच आमदार आहेत, ही मोठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.
या राज्यात काँग्रेसने बराच काळ घालविला. मात्र काँग्रेसच्या कार्यकाळात या समाजाला राज्यसभेवर संधी देण्यात आली नाही आणि विधान परिषदेवरदेखील संधी देण्यात आलेली नाही. काँग्रेसच काय, कुठल्याच पक्षाने संधी दिली नाही.
त्यामुळे भारतीय जनता पक्षानं मातंग समाजाला संधी द्यायला हवी, असा एक चर्चेचा सूर मातंग समाजाच्या नागरिकांमधून ऐकू यायला लागलाय.
वास्तविक पाहता मातंग समाजात तरुण तडफदार आणि निष्कलंक असे तरुण आहेत. यातले बहुतांश युवक भाजपशी संलग्न आहेत. तर काही राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यासह विविध पक्षांत आहेत. अगदी नावेच घ्यायची ठरवली तर दिलीप कांबळे, मधुकर कांबळे, अमित गोरखे, अशोक भाऊ लोखंडे, नितीन दिनकर, सुधाकर भालेराव, लक्ष्मणराव ढोबळे,राष्ट्र विकास सेनेचे अमोस मोरे,प्रशांत सदामते,दलित महासंघाचे मधुकर वायदंडे , विष्णुभाऊ कसबे, बिपीन घोरपडे, अभिमन्यू भोसले, मारुती वाडेकर , ऍड.राम चव्हाण, युवराज दाखले, सुदाम धुपे, गणेश वायदंडे या व्यक्तींपैकी एकाला राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी, अशी मातंग समाजाची रास्त अशी मागणी आहे.
जे काम साठ सत्तर वर्षांत काँग्रेसने केलं नाही, ते म्हणजे मातंग समाजाला राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचं काम आजमितीला केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपनं आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं करावं, अशी अपेक्षा मातंग समाजबांधवांमधून केली जात आहे.