प्रमुख मागणी अवैध वाळू तस्करीचे तत्काळ पंचनामे करून दोषींवर कारवाईची
कडेगाव:- कडेगाव येथे सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली व शेतकरी संघटना कडेगाव यांचे वतीने तालुक्यातील अवैध वाळू तस्करी,तलाठ्यांचा मुख्यालयातील मुक्काम, कार्यकाल पूर्ण झालेल्या व अवैध वाळू तस्करीस जबाबदार असलेल्या तलाठ्यांची बदली, तसेच वांगी येथील अवैध वाळू तस्करीस विरोध करणाऱ्या तलाठी यांची करण्यात आलेली बदली रद्द करून पूर्ववत करावी यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आले असून या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री , लोकायुक्त, महसूल लोक आयुक्त व कडेगाव पोलिस निरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, कडेगाव तालुक्यातील नदीकाठ क्षेत्रातील चोरी झालेल्या वाळू क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावेत.पंचनाम्यात दिसून येणाऱ्या वाळू चोरीस जबाबदार संबंधित तलाठी व तहसीलदार यांचेवर कलम ३७९ नुसार गुन्हे दाखल करावेत.सर्व मंडळ अधिकारी व तलाठी तालुक्यातील कामावर हजर झाल्यापासून सजे च्या ठिकाणी मुक्कामास न राहता शासनाचे घरभाडे घेतात त्यांच्यावर कारवाई व घेण्यात आलेले घरभाडे शासनाकडे जमा करून घेण्याची कारवाई करावी .तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकाराखाली मागणी केल्यास ती दिली जात नाही याची चौकशी करावी. कालावधी पूर्ण झालेल्या तलाठ्यांची तात्काळ बदली करावी .नदीकाठ क्षेत्रातील जास्त प्रमाणात वाळू चोरी झालेल्या गावातील जबाबदार तालुक्यांची तात्काळ बदली करावी .वाळूचोरीस विरोध करणाऱ्या वांगी येथील तलाठी यांची करण्यात आलेली बदली रद्द करून पूर्ववत करावी. निवेदनावर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम माळी , आरपीआय मुस्लीम आघाडी अध्यक्ष दस्तगीर फकीर, शेतकरी संघटना युवा जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी ,आरपीआय कडेगाव तालुका अध्यक्ष प्रवीण काळे ,आरपीआय युवा आघाडी अध्यक्ष रुपेश कांबळे व आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने यांच्या सह्या आहेत.