सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या लोकांची संख्या २३३ वर गेली आहे तर ९०० जण जखमी झाले आहेत. अजूनही बचावकार्य सुरूच आहे.
ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रेल्वे दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्य स्थापना दिनाचा सोहळा रद्द करत एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी मदत आणि बचाव पथके हजर आहेत. काही जखमी प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि बालासोरच्या आसपासच्या सर्व रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.