कडेगाव तहसील कार्यालय अजून किती पातळी सोडून काम करणार?
कडेगाव:- चिंचणी बेकायदेशीर फेरफार प्रकरणात तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी साठी पाठवलेले प्रकरणचं गायब झालं होतं. त्याबाबत नायब तहसीलदार यांनी लेखी सुद्धा कळवलं होतं मात्र याबाबत गोपनीय खबऱ्याने सडेतोड दणका दिल्यानंतर अवघ्या काही तासातच संबंधित प्रकरण सापडलं आहे. आता हे नक्की प्रकरण सापडलं की सापडत नसल्याचा बनाव केला जात होता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
चिंचणी बेकायदेशीर फेरफार प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांच्यावर ही कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती त्याची चौकशी करून सविस्तर अहवाल पाठवणे कामी उपजिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांना कळवले होते. सदर प्रकरण प्रांत कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आलं होतं.या प्रकरणात नक्की काय झालंय हे पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते डी एस देशमुख यांनी तोंडी माहिती घेण्याचा प्रयत्न केल्या नंतर त्याना समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी या प्रकरणाबाबतची सर्व कागदपत्रे माहिती अधिकारात मागवली. माहिती अधिकाराचा कालावधी संपल्यानंतर माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार यांनी, २५ मे २०३२३ रोजी “या कार्यालयाकडील RTS संकलाना कडील दप्तरी शोध घेतला असता सदर प्रकरण अद्याप आढळून आलेले नाही. सदर प्रकरण आढळताच आपणास पुरविण्यात येईल करीता आपणास आपल्या माहिती अर्जान्वये आपणास कळविण्यात येत आहे.” असे लेखी कळवले होते. ती प्रत देशमुख यांना ३ मे रोजी प्राप्त झाली.
यावर गोपनीय खबऱ्याने सडेतोड लिखाण केले होते. खबऱ्याच्या वृत्तानंतर अवघ्या काही तासातच संबंधित प्रकरण सापडलं असून आपण आपली माहिती हवी त्या स्वरूपात घेऊन जावी असा निरोप तहसील प्रशासनाकडून देशमुख यांना प्राप्त झाला. मग नक्की हे प्रकरण सापडत नव्हतं की सापडत नसल्याचा बनाव केला जात होता ? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कडेगाव तहसील अजून किती पातळी घसरून काम करणार आहे. आपण सर्वसामान्य लोकांच्या मनातील विश्वासार्हता हरवत चाललो आहोत हे तहसील प्रशासनाला समजणार आहे की नाही?. एकूणच वेळ आहे तोपर्यंत प्रशासनातील वरिष्ठांनी यात लक्ष घालून कारभार सुधारण्यास योग्य ती पावले उचलावी अशी मागणी होत आहे.