माहितीच्या अधिकारात माहिती उघड
कडेगाव:- कडेगाव तहसील प्रशासनाने आपल्या कारभारात सध्या अक्षरशः निर्लज्जपणाचा कळस केला असल्याचं दिसून येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी साठी पाठवलेले प्रकरणचं गायब झालं असल्याचं उघड झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणाच नायब तहसीलदार यांनी लेखी उत्तर देऊन केली आहे.जिथं उपजिल्हाधिकारी यांचेकडून चौकशी साठी आलेलं प्रकरण सुरक्षित नसेल तिथं सर्वसामान्य जनतेची कागदपत्रे सुरक्षित राहणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कडेगाव तहसील कार्यालय गेल्या काही दिवसांपासून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलं आहे. तहसील कार्यालयातील भोंगळ कारभारावर गोपनीय खबऱ्याने नेहमीच सडेतोड लिखाण केले आहे.चिंचणी बेकायदेशीर फेरफार प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांच्यावर ही कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती त्याची चौकशी करून सविस्तर अहवाल पाठवणे कामी उपजिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांना कळवले होते. सदर प्रकरण प्रांत कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आलं होतं.या प्रकरणात नक्की काय झालंय हे पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते डी एस देशमुख यांनी तोंडी माहिती घेण्याचा प्रयत्न केल्या नंतर त्याना समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी या प्रकरणाबाबतची सर्व कागदपत्रे माहिती अधिकारात मागवली.
माहिती अधिकाराचा कालावधी संपल्यानंतर माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार यांनी, “या कार्यालयाकडील RTS संकलाना कडील दप्तरी शोध घेतला असता सदर प्रकरण अद्याप आढळून आलेले नाही. सदर प्रकरण आढळताच आपणास पुरविण्यात येईल करीता आपणास आपल्या माहिती अर्जान्वये आपणास कळविण्यात येत आहे.” असे लेखी कळवले आहे. यावरून कडेगाव तहसीलदार कार्यालयात किती बेजबाबदार पणे कारभार सुरू आहे हे निदर्शनास येत असून जिथं उपजिल्हाधिकारी यांचेकडील चौकशी प्रकरण सुरक्षा नसेल तिथं सर्वसामान्य जनतेने दिलेली कागदपत्रे सुरक्षित राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे कारवाई चे प्रकरण जाणून बुजून तर गायब केले नाही ना ? असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.
कडेगाव तहसील प्रशासन माहिती अधिकार कायद्यानुसार आवश्यक माहिती देण्यास नेहमी टाळाटाळ करीत असल्याचा माझा अनुभव असून तोंडी माहिती दिली जात नाही तर माहिती अधिकाराला सुद्धा केराची टोपली दाखवली जात आहे. याबाबत आता अपील करणार असून योग्य कार्यवाही न झाल्यास तहसील प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.
डी एस देशमुख
नेते राष्ट्रवादी काँग्रेस कडेगाव

