Sangali Accident News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरू आहे. नुकतीच सांगलीमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर येत असून रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे.या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि रॉंग साईडने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडीत एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरहुन पंढरपूरच्या दिशेने चालले होते. यावेळी मिरज जवळील वड्डी गावाजवळ आल्यानंतर रॉंग साईडहुन विटाने भरलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.
या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला. भयंकर अपघातात एकाच कुटूंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

