सांगलीहून माधवनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्वर्गीय यांच्या पुतळ्याजवळ मदनभाऊ पाटील यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या चौकात टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते.
या दोघांवर शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असता त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश हरिश्चंद्र कांबळे ( वय ३८ रा. महावीर पार्क, सांगली) आणि विद्या नागनाथ विभूते ( वय ३५ रा. माळी चित्रमंदिर नजीक सांगली) अशी मृतांची नावे आहेत. भरधाव वेगाने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात टेम्पो चालक अरविंद लक्ष्मण वाघ ( वय ३७ रा. कुपवाड रस्ता, राजीवनगर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि. १० रोजी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी मयत प्रकाश कांबळे याचा भाऊ महादेव हरिश्चंद्र कांबळे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती अशी, प्रकाश कांबळे आणि विद्या विभुते हे दोघेजण कांबळे यांच्या मोटारसायकलवरून बुधवार दि. १० मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बायपास कॉर्नर ते कॉलेज कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन निघाले होते. रस्त्यावरील टीव्हीएस शोरूम समोर समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने ( क्र. एमएच १० सीआर ५२८५) दुचाकीस (क्र. एमएच १० सीआर ५२८५) जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले.
उपस्थितांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना गुरुवार दि. ११ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास प्रकाश कांबळे यांचा तर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विद्या विभुते यांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की हे दोघे वीस फूट लांब या टेम्पो बरोबर फरपटत गेले होते, या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होतात तरी येथे गतिरोधक करण्यात यावी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

