राज्यातील राजकीय समीकरणे सध्या बदलताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या एका वक्तव्याने महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले असून भाजप व राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे शरद पवारांनी ( Sharad Pawar) अदानी प्रकरणात जेपीसी नेमण्याबाबत वेगळं मत मांडले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस जेपीसीवर अडून आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारताना आता भाजप राष्ट्रवादीला डोळा मारणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर चंद्रकांत पाटील यांनी नकारार्थी उत्तर दिले आहेत. तसेच त्यांनी एक महत्त्वाचे आणि गंभीर भाकीत केले आहे. अगामी काळात महाविकास आघाडीतून एक एक पक्ष बाहेर पडतील असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे.
“पुढील निवडणूका होईपर्यंत महाविकास आघाडी एकत्र राहील असे वाटत नाही. हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी आम्हाला फायदा होतो आणि वेगवेगळे लढले तरी आम्हाला फायदा होतो. त्यामुळे त्यांनी कोणत्याही पद्धतीने निवडणूक लढवली तरी आम्हालाच फायदा होईल.” असे चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) म्हणाले आहेत.
अदानी प्रकरणात शरद पवारांनी बाजू घेतली. यावर आम्ही काय बोलणार अजून. आम्ही कुणालाही डोळा मारणार नाही आणि माझं कुणाच्याही डोळ्याकडे लक्ष नाही. मागच्या दीड वर्षात अनेकजण गळून पडतील. भाजपविरुद्ध लढणे कोणासाठीही सोप्पे नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सूचक इशारा देखील यावेळी दिला.

