सांगली जिल्ह्यात नक्की चाललंय काय?
सांगली:- सांगली जिल्ह्यातील एका तहसीलदार महोदयांनी स्वतः दिलेल्या निर्णयाबाबत फेर सुनावणी घेऊन निर्णय बदलल्याची धक्कादायक बाब समोर आली असून भ्रष्टाचाराचे हे नवीन प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सांगली जिल्ह्यात हे नक्की काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत खबऱ्या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेऊन असून प्रकरण हाती लागताच याचा पोलखोल केला जाणार आहे.
याबाबत खबऱ्याला मिळालेली माहिती अशी की, अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी एक वाहन पकडलं आणि तहसील कार्यालयात आणून लावलं होतं. या प्रकरणात दंडाची नोटीस मिळाल्यानंतर माझे वाहनात इतके गौनखनिज अवैध नसल्याचा खुलासा वाहन मालकाकडून सादर करण्यात आला, सोबत शासकीय पावती सादर करण्यात आली. सदर खुलासा संबंधित तहसीलदार यांनी अमान्य केला .मात्र वाहन मालकाने त्यावर नाराज होऊन प्रांताधिकारी यांचेकडे अपील दाखल केले. यात प्रांताधिकारी यांनी गौनखनिज पावत्या पाहून अपील अंशतः मान्य करून फेर चौकशी साठी तहसीलदार यांचेकडे पाठवले.
यात तहसीलदार महोदयांनी स्वतः च्या कोर्टात स्वतःलाच जाबदार बनवले आणि पूर्वी दिलेला स्वतःचा आदेश रद्द करीत कमी दंडाचा नवीन आदेश पारित केला. जाणकारांच्या म्हणण्यानुसार स्वतः दिलेला आदेश स्वतः रद्द करणे किंवा स्वतःच्या कोर्टात स्वतःला जाबदार बनवणे आणि सुनावणी घेणे बेकायदेशीर आहे. या प्रकरणात एका राजकीय नेत्याच्या शिफारशी वरून फेरबदल करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज राजकीय नेते ढवळाढवळ करीत नाहीत असे कोणतेही क्षेत्र नाही पण किमान अधिकाऱ्यांनी कागदपत्रे रंगवताना स्वतः अडचणीत येऊ अशी रंगवू नयेत. एकूणच याबाबत खबऱ्या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेऊन असून प्रकरणाबाबत खात्रीशीर माहिती मिळताच पोलखोल केली जाणार आहे.