राजकीय पक्ष शांतच
कडेगाव:-कडेगाव तालुक्यातून जाणाऱ्या गुहागर-विजापूर या महामार्गावर कडेगाव तालुक्यात येवलेवाडी आणि शिवणी फाट्याच्यामध्ये येवलेवाडी हद्दीत ठेकेदाराकडून टोल नाक्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच याठिकाणी टोल वसुली सुरू होईल. मात्र याबाबत स्थानिक जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संभ्रमावस्था असल्याचे पहावयास मिळत असून या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप सह प्रमुख विरोधी काँग्रेसही शांत असल्याने तालुक्यातील जनतेला टोल भरावाच लागणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सुमारे पाच वर्षांपूर्वी गुहागर- विजापूर या महामार्गास मंजुरी देताना त्याची लांबी २८३.०८ किमी इतकी ठरवली. या रस्त्यास १४७४.८९ कोटी रुपये निधीची तरतूद ही केली. हा महामार्ग १० मीटर मुख्य आणि ३ मीटर साईड पट्टी असा १३ मीटर रुंदीचा आरसीसीमध्ये झाला आहे. या महामार्गामुळे कर्नाटक व कोकण जोडले जाणार आहेत. मात्र या महामार्गावर कडेगाव तालुक्यात येवलेवाडी हद्दीत टोल नाका उभारण्यात आला आहे. त्याचे कामही आता अंतिम टप्प्यात आलं आहे आणि लवकरच टोल वसुली सुरू होईल असं बोललं जातं आहे.मात्र या टोल बाबत प्रारंभी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी यास कडाडून विरोध केला होता. यात काँग्रेस पक्ष पुढं होता.
युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव इंद्रजित साळुंखे यांनी त्यावेळी सांगितले होते की, विजापूर-गुहागर हा मुख्य महामार्ग भाजपच्या लोकप्रतिनिधींनी कडेगाव, विटामार्गे न करता पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ यामार्गे वळवला होता. त्यानंतर माजी मंत्री स्व.डॉ. पतंगराव कदम यांनी जनरेटा उभा केल्याने कराड ते नागज या अतिरिक्त मार्गास मंजुरी मिळाली होती. त्यामुळे या मार्गावर कायद्याने टोल घेताच येणार नाही आणि तसा प्रयत्न झाल्यास आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठे जनआंदोलन उभा करू, तसेच शेतकरी कामगार पक्षाचे एड सुभाष पाटील यांनीही टोल ला विरोध करत जन आंदोलन उभा करू असा इशारा दिला होता.सध्या या टोलचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वसुली सुरू होईल अशी अपेक्षा आहे मात्र आजअखेर तरी कोणत्याही राजकीय पक्षाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
टोलनाक्यास प्रचंड विरोध आहे
कडेगाव पूर्व भागातील हजारो शेतकरी शासकीय कामासाठी रोज कडेगावला ये-जा करत असतात. तसेच कडेगावला चांगली बाजारपेठ असल्याने ही या भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी नेत असतात. या ठिकाणी टोलनाका झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे या टोलनाक्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांच्या विरोधास एखाद्या राजकीय पक्षाची साथ मिळाल्यास आंदोलनात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि वेगळा निर्णय होऊ शकतो.
आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष
या भागातील शेतकरी आपली भूमिका या मतदार संघाचे आमदार डॉ विश्वजित कदम यांच्याकडे घेऊन जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून टोल बाबत डॉ कदम काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या डॉ कदम विरोधी बाकावर आहेत आणि डॉ कदम यांनी टोलला विरोध केल्यास मोठं जन आंदोलन उभा राहू शकते.
