पलूस : खबऱ्या प्रतिनिधी / पलूस तालुक्यातील अंकलखोप सहकारी पीक संरक्षण संस्थेत बोगस सदस्यांची नोंद घातल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पिकांचे संरक्षण हा आधुनिक शेती पद्धतीचा अविभाज्य आणि महत्त्वाचा पैलू आहे.खरे तर अंकलखोप परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे सहकाराने प्रयत्न केल्यास कीड नियंत्रण यशस्वी होण्याची खात्री असल्याने व सुधारित शेती व्हावी या हेतूने १९८३ साली पीक संरक्षण संस्था उभी केली आहे. याचा फायदा ग्रामस्थांना व्हावा हाच मूळ उद्देश.
किसान क्रेडिट कार्ड योजना, कृषी विमा, कृषी कर्ज कायद्यानुसार संस्थेकडून शेतीसाठी पतपुरवठा, राष्ट्रीय कृषी विमा योजना, दूध व्यवसायासाठी कर्ज, शेतमाल तारण कर्ज, शेतमाल जळीत झाल्यास तातडीची मदत या योजनांसह कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांना मजबूत करण्याचा निर्णय अंकलखोपच्या पीक संरक्षण संस्थेने घेतल्याने सर्व समाधानी होते.
परंतु गाव करी ते “राव” न करी या वाक्याचा उलटा प्रत्येय ग्रामस्थांना आल्याचे दिसून येत आहे. पिता पुत्राने अधिकाराचा गैरवापर करीत अजून मिसरूडही फुटले नसलेल्या तरण्याबांड पोरांची सभासद म्हणून नावे बोगस पद्धतीने नोंद केल्याची भानगड खबऱ्याच्या कानावर पोहोचली. गोपनीय पद्धतीने याची चौकशीही केली.यामध्ये पन्नास पेक्षा जास्त नावे बोगस पद्धतीने सभासद म्हणून नोंद केली असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. याप्रकरणी संस्थेच्या कारभाऱ्यांची व कागदोपत्री संस्थेच्या कारभाराची पारदर्शकपणे चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ च्या तरतुदी प्रमाणे अचूक यादी दिली असल्याचे प्रमाणपत्र सचिवांनी दिल्याने तातडीने सचिवांसह कारणामा करणाऱ्या पिता पुत्रांवर कारवाई करण्याची मागणी शासन स्तरावर वरिष्ठांकडे केली असल्याचे समजते आहे.