मिरज : खबऱ्या प्रतिनिधी /१७ व्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनासाठी मिरज नगरी सज्ज झाली असून एकूण ३००० कामगार व कामगार कुटुंबियांनी संमेलनासाठी नावनोंदणी केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांच्या
अध्यक्षतेखाली दि. २४ व २५ फेब्रुवारी रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य नगरी, बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे संमेलन होणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक असून कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त तथा संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रविराज इळवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.४५ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ग्रंथदिंडीस सुरुवात होईल. सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, मनपा कार्यालय या मार्गाने स्वा.वि.दा. सावरकर प्रवेशद्वार बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ग्रंथदिंडीचा समारोप होईल.
सकाळी ९.३५ वाजता विंदा बालमंचाचे उदघाटन करण्यात येईल. त्यानंतर डॉ. शंकरराव खरात ग्रंथ दालनाचे तसेच लोकशाहीर पठ्ठे बापूराव कविता भिंतीचे उदघाटन करण्यात येणार आहे. संमेलनाचा उद्घाटन सोहळा तसेच सर्व सत्रांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच येथे होणार आहे.
सकाळी १० वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा होईल. संमेलनाच्या पहिल्या सत्रात चला उद्योजक होऊ या विषयावर डॉ. विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स ग्रुप लि.), रामदास माने (माने ग्रुप ऑफ कंपनीज), हनुमंतराव गायकवाड (भारत विकास ग्रुप इंडिया लि.), गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह) या उद्योजकांची प्रकट मुलाखत होणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कामगार चळवळीची कथा आणि व्यथा, मराठी साहित्यात कामगार जीवनाचे चित्र शोधताना, आम्ही का लिहितो?, व्यसनमुक्तीची लढाई या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवी संमेलन आणि काव्य मैफलीचा रसिक प्रक्षेकांना आस्वाद घेता येणार आहे.
संमेलनात कथाकथनाचे सादरीकरण होणार असून अभिरूप न्यायालय देखील भरवले जाणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचा अभिरूप न्यायालयात सहभाग असेल. कामगार साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या महाकल्याण युट्यूब चॅनलवर तसेच राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन २०२३ या नावाने तयार
करण्यात आलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.