Eknath Shinde Shivsena News : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद निवडणूक आयोगाने सोडवला आहे.
आयोगाने याबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. तर एकनाथ शिंदे यांच्या गटात आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान, आमचा उल्लेख आता शिंदे गट नाही तर शिवसेना म्हणून करा, अशी मागणी शिंदे गटाकडून माध्यमांना करण्यात आली आहे. शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी माध्यमांना हे पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात वृत्तांकन करताना शिंदे गट असे न लिहिता ‘शिवसेना’ असे संबोधावे असे म्हटले आहे. (Political News)
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात फूट पडली. यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. आमचीच खरी शिवसेना असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला. पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने यावर सुनावणी घेताना हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवलं.
त्यामुळे या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडेही सुनावणी सुरू झाली. सर्वांची बाजू ऐकून झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला होता. १७ फेब्रुवारीला सायंकाळी निवडणूक आयोगाने राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले. त्यानुसार शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला.
निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अधिकृत घोषणा होऊनही अजूनही वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल माध्यमांमधून शिंदे गट असाच उल्लेख करण्यात येत आहे. याबाबत शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रक पाठवले आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात वृत्तांकन करताना शिंदे गट असे न लिहिता ‘शिवसेना’ असे संबोधावे असे म्हटले आहे.

