मिरज :खबऱ्या प्रतिनिधी / संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मिरजेतील तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार कुंभार यांच्या समोरील सुनावणी आज पूर्ण झाली. मिरजेत ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने दुकाने पाडल्याप्रकरणी मिरज तहसीलदारांनी ताब्यात घेतलेल्या वादग्रस्त जागेबाबत शुक्रवारी सायंकाळी पुन्हा सुनावणी झाली. जवळपास चार तास सुनावणी सुरू होती. दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर केली. संपूर्ण सुनावणी पूर्ण झाली. मात्र, तहसीलदार तथा दंडाधिकारी यांनी अद्याप निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानका जवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी दोन आठवड्यापूर्वी मध्यरात्री शंभर ते दिडशे जणांच्या जमावा सोबत येऊन चार जेसीबीच्या सहाय्याने दहा दुकाने पाडून एक कोटी रुपयांचे नुकसान केले. याबाबत पडळकर यांच्यासह दिडशे जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. या वादग्रस्त जागेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार दगडू कुंभार यांनी “जैसे थे” परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वादग्रस्त जागा ताब्यात घेऊन दोन्ही गटांना तेथे हालचाली करण्यास मज्जाव करण्यांत आला आहे.
याबाबत तहसिलदार दगडू कुंभार यांच्यासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीत पडळकर यांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत मागितली होती यावर तहसीलदार दगडू कुंभार यांनी कोणालाही मुदतवाढ देण्यास नकार देऊन शुक्रवारी याबाबत निर्णय देणार असल्याचे जाहिर केले. त्याप्रमाणे शुक्रवारी जवळपास रात्री नऊ वाजेपर्यंत चार तास सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांनी कागदपत्रे सादर केली आहेत.मात्र सुनावणीस रात्री उशिर झाल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आला आहे. याबाबतीत रविवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता खबऱ्याच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
तहसीलदारांच्या निर्णयानंतर सुद्धा दोन्ही बाजूच्या पक्षकारांना पुढील न्यायालयीन लढा उच्च स्तरावर लढावा लागेल असे जाणकार मंडळींच्या चर्चेतून समजते आहे.