सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात अख्य गावच शाकाहारी असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय या गावात नांदायला येणाऱ्या सुनेला चक्क मांसाहाराचा त्याग करण्याची शपथ खावी लागते.
जिल्हा हा तसा पाहिला तर कोल्हापूरप्रमाणेच मांसाहारप्रेमी जिल्हा! प्रत्येक गावातील रस्त्या-रस्त्यांवरील आणि चौका- चौकांतील धावे ही त्याचीच निशाणी आहेत; पण मांसाहार खवय्यांच्या या मांदियाळीतही जिल्ह्यातील एक गाव आपले शुद्ध शाकाहारीपण टिकवून आहे, ते गाव म्हणजे खानापूर तालुक्यातील रेणावी. रेणावी गावी नवनाथांपैकी रेवणसिद्धनाथांचे ठाणे आहे. हे देवस्थान जागृत समजले जाते. या गावात शेकडो वर्षांपासून मांसाहार वर्ज्य आहे. त्यामुळे संपूर्ण गावच शाकाहारी आहे. लग्न करून बाहेरून या गावात नांदायला येणाऱ्या सुनेलाही उंबऱ्यावरचे माप ओलांडण्याआधी मांसाहाराचा त्याग करावा लागतो. एवढेच नव्हे, तर या गावच्या जावयाचेही मांसाहार सोडून सगळे कोडकौतुक पुरविले जाते. कामधंदा आणि नोकरीनिमित्त या गावातून बाहेर जाणारी मंडळीसुद्धा आपला हा ‘शाकाहार मंत्र’ कटाक्षाने जपताना दिसतात.