मुंबई: खबऱ्या प्रतिनिधी / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्त्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यात आज युती करण्यात आली आहे.
राज्यातील आगामी स्थानिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही युती शिंदे गटासाठी महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि पीआरपी यांचा महायुतीत समावेश झाला आहे.

याबाबत प्रा. जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली. त्यावेळी ठाकरेंनी आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही. सर्व सामान्यात मिसळणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला. धाडसी मुख्यमंत्री महाराष्ट्रला लाभला. महाराष्ट्रला नवीन दिशा देण्यात काम करु, असे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांना न्यायच देण्याची भूमिका सरकारने घेतली. आमचा संघर्ष साधासुधा नव्हता. चळवळीत आक्रमकपणे न्याय मिळवून दिला. दोन्ही पक्ष संघर्षातून पुढे आले आहेत. कवाडेंसोबत आधीपासूनच जिव्हाळ्यांचे संबध आहेत. लाठ्या-काठ्या खाऊन इथपर्यंत पोहचलो आहे. लोकांना न्याय देणारे दोन्ही पक्ष एकत्र आले. कवाडे यांचे आंदोलन देशव्यापी होते.

आमची बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका असल्याचे शिंदे यांनी म्हटले. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीची चर्चा सुरू असतानाच या युतीची घोषण करण्यात आली आहे.
दरम्यान, पीआरपीचे संस्थापक आणि अध्यक्ष कवाडे हे आंबेडकर चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तसेच चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. या युतीमुळे शिंदे गटाला दलित मते मिळणार असल्याचे मानले जात आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि आरपीआय (आठवले गट) रामदास आठवले हेही आधीपासूनच युतीत आहेत.प्रसंगी शिंदे गटाचे प्रमुख नेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

