प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने सर्वसामान्य जनता हैराण
कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील नेवरी गावालगत येरळा नदी असताना शिवाय पात्रात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आणि त्यात मुबलक पाणीसाठा असताना गावातील कित्येक प्रभागांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे गावात पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की पाणीपुरवठा विहिरीवरील विदुयत पंपात बिघाड झाला आहे मात्र प्रत्यक्षात येरळा नदी पात्रातून आणि गावालगत असणाऱ्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो मग विदुयत पंप एक ठिकाणचा बिघडला असेल तर दुसरीकडून पाणीपुरवठा का केला का केला जात नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे तर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने सर्वसामान्य जनता मात्र हैराण झाली आहे.
ताकारी व टेंभू सिंचन योजनांच्या माध्यमातून येरळानदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यात बारमाही पाणी सोडले जाते. मात्र पाणी पुरवठा कर्मचा-यांच्या मनमानी कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने ग्रामस्थांना पाण्यासाठी चार चार दिवस वंचित राहावे लागत आहे. भरपूर पाणी असताना गावात प्रत्येक प्रभागात चार दिवसांतुन एकदा पाणीपुरवठा केला जातो. यामुळे ग्रामस्थांची पाणी उशाला व कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. त्यात पाणीपुरवठा कर्मचारी सर्वसामान्य जनतेशी व्यवस्थित बोलत नाहीत, पाणीपुरवठयाची माहिती व्यवस्थित देत नाहीत त्यांच्यावर कोणाचाही दबाव नाही. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारात सर्वसामान्य जनता मात्र नाहक भरडली जात आहे.गटविकास अधिकाऱ्यांनी या पाणीपुरवठा गोंधळ कारभाराची सखोल चौकशी करून गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
गावामध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा वितरण व्यवस्था कालबाह्य झाली आहे , या कालबाह्य यंत्रणामुळे ग्रामपंचायतीला मिळणारी वसुली या दुरूस्तीवरच जास्त खर्च होत असल्याचं दिसत आहे. प्रशासनाने वेळेत योग्य ती पावले उचलून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

